पत्रकार केवल महाडीक यांच्या हत्येची सुपारी? अज्ञात गुंडांकडून पाठलाग, पोलिस करणार का कारवाई ?
पनवेल / प्रतिनिधी
पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक तथा साप्ताहिक रायगडचा भूमिपूत्र आणि कोकणसंध्या वृत्तपत्राचे संपादक केवल दिपक महाडीक यांच्या हत्येची सुपारी घेऊन काही इसम पाठलाग करत आहेत. याबाबत पनवेल पोलिसात तसेच खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी जलदतीने तपास करुन संशयितांचा शोध घ्यावा अशी मागणी पत्रकारांकडून होत आहे.
शनिवारी चार ते पाच इसम केवल महाडीक यांना शोधण्यासाठी त्यांचे असोसिएशनचे कार्यालय, राहत्या घरी व नवीन पनवेल परिसरात फिरत होते. रात्री मिंट हुक्का पार्लर येथे या इसमांनी "केवल महाडीक है क्या उसको खतम करना है आज उसको ठोकना ही है" अशी विचारणा केली. मात्र श्री. महाडीक तेथे नसल्याने या हल्लेखोरांपासून बचावले. तेथील हुक्काचालकावर चिडून ते गुंड तेथून निघून गेले.
तसेच दोन दिवसांपूर्वी एक इसम मनोज म्हात्रे नाव सांगून कार्यालयात आला. त्याने श्री. महाडीक यांचा नंबर घेऊन त्यांना फोनवर अनिल अंबानी नाव असल्याचे सांगितले. कार्यालयात श्री. महाडीक नसल्याने त्याने वारंवार फोन करुन ओवळे येथे बोलावले. त्याप्रमाणे केवल महाडीक ओवळेत गेले असता संबंधित इसमाने फोन बंद केला. नवीन पनवेल येथे मिंट हुक्का पार्लरमध्ये मारण्यासाठी आलेल्या लोकांचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असता लाईट गेली होती असे हुक्का पार्लरचा मालक राजन तेली यानेे सांगितले.
चौकट :
पोलिसांची भूमिका ठरणार लक्षवेधी.
पत्रकार केवल दिपक महाडीक गेल्या १८ वर्षांपासून यांनी पनवेल तसेच रायगडच्या पत्रकारितेत वेगळा ठसा उमटवला आहे. अवैध धंद्यांविरोधात त्यांच्या धाडसी लिखानाने अनेकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. पत्रकार मित्र असोसिएशनच्या माध्यमातूनही त्यांनी सर्वसामान्य जनतेचे तसेच पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. डॅशिंग बातम्या करण्यात पनवेलमध्ये त्यांची ख्याती असल्याने अनेकांना त्यांचे वर्चस्व सहन होत नाही. त्यांच्या हत्येचा कट आणि धमकी याबाबत खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र या प्रकरणात पोलिस नेमके काय भूमिका घेतात आणि हल्लेखोरांचा कसा तपास लावतात याची पनवेलमधील पत्रकार वाट पाहत आहेत. एकंदरीतच अवैध धंद्यांविरोधात बातम्यांचे बादशहा केवल महाडीक अशी ओळख असलेल्या व्यक्तीमत्वाला असे धमकावले जात असेल तर पनवेल मधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे उघड होते. यात पोलिसांनी वेळीच दखल घेउन संशयितांना गजाआड करावे अन्यथा केवल महाडीक यांचे काही झाले तर ? पोलिसांना जबाबदार धरले जाईल असा इशारा पत्रकार मित्र असोसिएशनने दिला आहे.