आपत्ती व्यवस्थापन कार्याचा आयुक्तांनी घेतला आढावा;कळंबोली,पनवेलमध्ये पाणी साठू नये यावरील उपाययोजनांवरती बैठकित चर्चा


आपत्ती व्यवस्थापन कार्याचा आयुक्तांनी घेतला आढावा;कळंबोली,पनवेलमध्ये पाणी साठू नये यावरील उपाययोजनांवरती बैठकित चर्चा


पनवेल,दि.08 : महापालिका कार्यक्षेत्रात शनिवार दिनांक 6 जुलैला रात्री झालेल्या मुसाळधार पावसामुळे  ज्या ज्याठिकाणी पाणी साठले त्या मागील कारणमीमांसा करण्यासाठी आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्यालयात आज दिनांक 8 जुलै रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी पाणी तुंबण्याच्या समस्यांवरती  तातडीने उपाय योजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेशित केले.

यावेळी सहाय्यक संचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे,  उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त मारूती गायकवाड, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शनिवारी रात्री झालेल्या  मुसळधार पावसामुळे कळंबोलीमध्ये विविध ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. वास्तविक पहाता कळंबोली भाग हा समद्रीसाटीपासून खाली आहे. इतरवेळी पाऊस जास्त आल्यास , पाणी पंपाच्या साह्याने धारण तलावामध्ये सोडण्यात येते. धारण तलावामधील पाणी  खाडी मध्ये सोडण्यात येते. परंतू रविवारी भरती असल्याकारणाने व याचवेळी पाऊस जास्त आल्याने खाडी मध्ये पाणी सामावून घेतले गेले नाही. पाणी पुन्हा मागे आले व कळंबोलीतील सखल भागात सर्वत्र पाणी साठले. या समस्येवरती आजच्या बैठकित चर्चा करण्यात आली. पाणी तुंबण्याच्या कारणांचा आढावा आयुक्तांनी घेतला. तसेच यावेळी सिडकोच्या ताब्यातील मलनिस्सारण केंद्रामधील सात पंप पैकी चार पंप सुरू होते त्यामुळे नागरिकांच्या शौचालयामधून घरांमध्ये पाणी आले असल्याची माहिती मलनिस्सारण विभाग प्रमुखांनी दिली. पाणी साठण्यामागील हे देखील महत्वाचे कारण होते. त्यामुळे हे मलनिस्सारण केंद्र तातडीने महापालिकेच्या ताब्यात घेण्याविषयी सिडको प्राधिकरणाबरोबर पत्रव्यवहार करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित विभागास दिल्या.

 तसेच कळंबोलीतील तीन मुख्य नाल्यांतून पाणी पुढे का गेले नाही , तिथे निर्माण झालेल्या अडचणी त्यावरील उपाययोजना याबाबत आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला. या ठिकाणी तातडीने उपाय योजना करण्याबाबतच्या  सूचना आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 तसेच यावेळी पनवेल व नवीन पनवेलमध्ये पाणी साठण्याची कारणे यावर चर्चा करण्यात आली. पनवेलमधील कच्छी मोहल्ल्यामधील भारत नगरमध्ये व नवीन पनवेलमध्ये बांठिया शाळा,तक्का येथे मुसळधार पावसाने पाणी साठल्याचे दिसून आले. याठिकाणी पाणी साठू नये यावरील तोडगा काढण्यावरती  बैठकित चर्चा करण्यात आली.

तसेच या बैठकित अग्निशमन केंद्रांची सेवा वाढविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच सिडकोकडील अग्निशमन केंद्र हस्तांतरण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.