भारतीय संविधान हे जनतेला सन्मानाची हमी व विकासाची संधी देणारे आहे -सुभाष वारे
नवी मुंबई दि.19:- भारतीय संविधान हे देशातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सन्मानाची हमी व विकासाची संधी देणारे साधन असून डॉ. बाबासाहेबांचे हे संविधान देशातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी आजही सक्षम आहे, असे प्रतिपादन सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्याध्यक्ष श्री. सुभाष वारे यांनी केले.
प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, मुंबई विभाग, कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ कोकण भवन शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक समता’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “भारताचे संविधान आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्यावेळी वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त कमलेश नागरे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, कोकण भवनचे वैद्यकीय अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ कोकण भवन शाखेचे सचिव डॉ. गणेश धुमाळ, प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाच्या सहाय्यक संचालक मिनाक्षी वैद्य आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पणकरुन अभिवादन करण्यात आले.
नागरिकांच्या दृष्टीकोनांतून संविधानाचे महत्व काय आहे हे सांगतांना श्री. वारे म्हणाले की, संविधानाबद्दल कौतुकाने बोलण्याचे दिवस राहिलेले नाहीत, आता संविधान वाचविण्यासाठी बोलणे गरजेचे आहे. संविधानामधील सामाजिक न्यायाची व्याख्या व्यापक आहे. त्यामुळे संविधानाबद्दलचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. एकलव्य, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची लढाई पुढे नेण्याचे संविधान हे प्रभावी साधन आहे.
श्री. वारे यांनी सहज सोप्या पध्दतीने वेगवेगळी उदाहरणे सांगून संविधानातील महत्त्वाचे मुद्दे मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिला, बालके तसेच नोकरदार वर्ग यांच्यासाठी संविधानात केलेल्या तरतूदींबाबत श्री. वारे यांनी सोप्या शब्दात माहिती दिली. डॉ.बाबासाहेब आांबेडकर हे केवळ दलित, शोषितांचे नेते नसून संपूर्ण मानव जातीला समृध्द व उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे नेते होते. बाबासाहेबांनी संविधानाव्दारे फक्त शोषितांना मुक्त केले नसून संपूर्ण भारतातील समाज यंत्रणेला मोठमोठया अडचणींतून मुक्त केले आहे. असे मत श्री. वारे यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अश्विनी चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, कोकण भवनातील अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.