महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाली येथील विश्रामगृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन
रत्नागिरी, दि. 19 (जिमाका) : पाली येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या विश्रामगृहाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.
याप्रसंगी एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, प्रांताधिकारी जीवन देसाई, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, बाबू म्हाप, सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष घाडगे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आली आहेत. महामंडळाकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाली येथे अद्ययावत विश्रामगृह बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागा हस्तांतरीत करण्यात आली व प्रस्तावित नवीन अद्यावत विश्रामगृह उभारण्यात येणार आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ७७७.०० चौ.मी. असे आहे. प्रस्तावित विश्रामगृह दुमजली असून त्यामध्ये १ अतिमहत्वाचा कक्ष व ४ सर्वसामान्य कक्ष आहेत. तसेच अतिथीकरिता प्रतिक्षा जागा, भांडारगृह, स्वयंपाकगृह, जेवणाची खोली, प्रसाधनगृह, युटीलिटी खोलीचा समावेश करण्यात आला आहे.