नवी मुंबईतील पार्कींग व्यवस्था नियोजनासाठी आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांची सातत्यपूर्ण आढावा बैठकीतून गतीमान कार्यवाही
नवी मुंबई शहरापुढे पार्कींग समस्या दूर करण्यासाठी नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नियोजनबध्द पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने वारंवार आढावा बैठका घेत विभागनिहाय पार्कींग प्लॉट विकसीत करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
या अनुषंगाने सीबीडी बेलापूर येथील सेक्टर 15 मध्ये भूखंड क्र. 39 या 4705 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर 4 मजली वाहनतळ विकसीत करण्यात आला असून येत्या काही कालावधीतच हा वाहनतळ लोकांच्या वापरासाठी खुला होऊन या परिसरातील वाहनतळाची समस्या मोठया प्रमाणात मार्गी लागणार आहे. येथे 396 चारचाकी व 121 दुचाकी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था असणार आहे.
त्याचप्रमाणे से.15 सीबीडी बेलापूर येथे प्लॉट क्र.- 72 या 6900 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर तसेच सेक्टर 30 ए, वाशी येथे हॉटेल तुंगा समोरील 11300 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाहनतळ विकसीत करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सदर भूखंडांवरील वाहनतळ शासन व खाजगी संस्था भागीदारी (Public Private Partnership) तत्वावर विकसीत करण्याच्या पर्यायांचा अंदाज घेण्यात येत असून त्यादृष्टीने अशाप्रकारे वाहनतळ विकसीत करण्याचे फायदे, यासाठी आवश्यक परवानग्या, त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत आयुक्तांना अभियांत्रिकी विभागामार्फत माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले.
हे वाहनतळ खाजगी संस्था भागीदारी (Public Private Partnership) तत्वावर विकसित करण्याकरिता फिजीबिलिटी तपासून रिपोर्ट तयार करण्याचे काम मे. फिडबॅक इन्फ्रा प्रा. लिमी. या संस्थेमार्फत करून घेण्यात येत असून या जागांचा वाहनतळासोबतच वाणिज्य वापरासाठीही उपयोग करणेबाबत पाहणी करण्यात येत आहे.
या सादरीकरणामध्ये वाहनतळ विकसीत करण्यापूर्वी तेथील वाहतुकीची प्रत्यक्ष वर्दळ, वाहनतळाच्या जागेची रचना व उपलब्धता तसेच विद्यमान स्थितीत त्या परिसरात वाहने उभी करण्यासाठी वापरली जाणारी पध्दती अशा विविध बाबींचा अभ्यासपूर्ण अहवाल मांडण्यात आला.
सद्यस्थितीत हा भाग कार्यालये व इतर व्यावसायिक गोष्टीने गजबजलेला असल्याने वाहने उभी करण्यासठी रस्त्यांच्या दोन्ही कडेकडील बाजूंचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूकीला ब-याच ठिकाणी अडचण निर्माण होत आहे. यावर उपाययोजनेच्या दृष्टीने हे दोन्ही वाहनतळ उपयोगी ठरणार आहेत. वाहनतळाचे नियोजन करताना विदयमान वाहनांच्या वाहतुकीचा विचार करण्यासोबतच या भागाचा आगामी कालावधीत होणारा विकास व त्यामुळे वाढणा-या संभाव्य वाहनांच्याही विचार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
शासन व खाजगी संस्था भागीदारी (Public Private Partnership) तत्वावर वाहनतळ विकसीत केल्यास महानगरपालिकेस आपला निधी यामध्ये गुंतवावा लागणार नाही, शिवाय महानगरपालिकेस महसूलही प्राप्त होईल.
या वाहनतळांचे दर नागरिकांना परवडणारे असावेत याचाही साकल्याने विचार करुन सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी वाहनतळासाठी निश्चित केलेले दर यांचा तौलनीक अभ्यास करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
अशाच प्रकारे शहरातील इतर भागांमध्येही वाहनतळ विकसीत करण्यासाठी नियोजन करावे व सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल जलद सादर करावा असे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यावान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेंद्र इंगळे, मालमत्ता विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत वाहनांचे प्रमाण मोठया संख्येने वाढले असून सर्वच शहरांसमोर गाड्यांच्या पार्कींगची बिकट समस्या उभी असल्याचे आढळून येते. नवी मुंबई शहरातही वाहने उभी करण्याची समस्या असून ती दूर करण्यासाठी नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर बारकाईने लक्ष देत महानगरपालिकेचे संबंधित विभाग तसेच वाहतुक पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासमवेत नियमित आढावा बैठकांचे आयोजन करून या कामाला गती देत आहेत.