राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल एकूण 17 हजार 517 प्रकरणे निकाली-17 कोटी 60 लाख 59 हजार 18 रुपयांची तडजोड रक्कम वसूल

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल एकूण 17 हजार 517 प्रकरणे निकाली-17 कोटी 60 लाख 59 हजार 18 रुपयांची तडजोड रक्कम वसूल


अलिबाग, दि.14 (जिमाका):- न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन लोक न्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयाच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रुढ झालेला आहे.  

      रायगड जिल्ह्यात (दि.13 ऑगस्ट 2022) रोजी झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 17 हजार 517  प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.

       राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती.

      रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखल पूर्व व प्रलंबित अशी एकूण 95 हजार 82 प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.  त्यापैकी दाखलपूर्व 15 हजार 911 व प्रलंबित प्रकरणांपैकी 1 हजार 606 प्रकरणे अशी एकूण 17 हजार 517 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोकअदालतीमध्ये निकाली निघाली व त्याद्वारे पक्षकारांना एकूण 17 कोटी 60 लाख 59 हजार 18 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली. 

*पाच जोडप्यांचा लोकअदालतीत पुन्हा जुळला संसार*

     अलिबाग येथील लोकन्यायालयात 5 जोडप्यांचा ज्यामध्ये जेष्ठ नागरिक पती-पत्नी होते, त्यांचा सामंजस्याने वाद मिटल्यामुळे नांदायला गेली. त्या पक्षकारांचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एस. सावंत व पॅनलवरील न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

        रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयात 48 लोकअदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलचा वापर करूनसुद्धा प्रकरणे मिटविण्यात आली.

         या लोकन्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद रायगड, पोलीस अधीक्षक रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. सावंत व न्यायाधीश तथा सचिव अमोल अ.शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image