पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर विंधण विहिरींच्या कामांना मंजुरी मिळेना
नवीन पनवेल (मयूर तांबडे) : पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, असे असले तरी देखील विंधण विहिरींच्या कामांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे शासनाचे आदिवासी भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
गाढेश्वर धरण बाजूला असून देखील या धरणाचे पाणी आदिवासी वाड्यांना प्यायला मिळत नाही. त्यामुळे धरण उशाला, कोरड घशाला अशी परिस्थिती आदिवासी पाड्यांवरील नागरिकांची झाली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून पाणी टंचाई सदृश्य वाड्यांवर विंधण विहीर मारण्यासाठीचा प्रस्ताव अलिबाग येथे पाठवला आहे. मात्र तो प्रस्ताव लालफितीत अडकला असल्याचे समोर आले आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत आला तरीदेखल विंधण विहिरींच्या कामांना मंजुरी मिळत नाही.
त्यामुळे यातून नक्की काय साध्य करायचे आहे असा सवाल उपस्थित होत आहे. पाणी टंचाई असलेल्या गावात किंवा वाडीवरील पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी विंधण विहीर मारली जाते. मात्र जून महिन्याचे पंधरा दिवस संपत आले तरी देखील विंधण विहिरीची कामे मंजूर झालेली नसल्याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे.
2021 मध्ये देखील पनवेल तालुक्यातील 10 वाडे आणि ८ वाड्यांचा विंधण विहिरींचा प्रस्तावित आराखडा अलिबाग येथे पाठवण्यात आला होता. मात्र केवळ पोयंजे- ठाकूरवाडी याठिकाणी विंधण विहिरीला मंजुरी मिळाली होती. मात्र या ठिकाणी देखील विंधण विहीर खोदण्यात आलेली नसल्याची माहिती पनवेल पंचायत समिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. 2022 मध्ये तुराडे-ठाकूरवाडी, पोयंजे- आदिवासीवाडी, चेरवली -आदिवासीवाडी, सांगटोली-आदिवासीवाडी, नानोशी कामठवाडी, सांगूरली फणसवाडी, नांदगाव -आदिवासी वाडी, मालडुंगे-वाघाचीवाडी, वावंजे- भेंडीची वाडी, कानपोली-हेदुटणे, पाली-कातकरवाडी, बकुळवाडी या आदिवासी वाड्यांवर विंधण विहिरी मारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जून महिना उजाडून अर्धा महिना संपत आला तरी विंधण विहिरी मंजूर होत नसल्याने विंधण विहिरीचा विषय फक्त दिखावा असल्याचे स्पष्ट होत आहे.