विमानतळाला दिबांच्या नावाची मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्यानंतर रंगली श्रेयवादाची लढाई
पनवेल: प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कोणाचे? भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व.दि बा पाटील यांचे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे, याबाबत गेल्या काही दिवसांपासून पनवेल-नवी मुंबईत संघर्ष सुरू होता. अखेर या वादावर पडदा पडल्याचे चित्र समोर येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारने सहमती दर्शवली असल्याची माहिती आज (मंगळवार दि.२८ जून) प्रकल्पग्रस्त नेतेमंडळींच्या शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आली.
मंगळवारी पनवेल, नवी मुंबई, रायगड मधील प्रकल्पग्रस्त नेतेमंडळींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला काहीच हरकत नसल्याचे म्हटले. यावरून आता सर्वपक्षीय कृती समिती विरुद्ध महाविकास आघाडीतील नेतेमंडळी यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. सोशल मीडियावरून देखील दिबांच्या नावाचा ठराव अखेर कोणी आणला, याबाबत चर्चांसह श्रेयवादाला उधाण आले आहे.
लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या संघर्षामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर सहमती दर्शवली आहे, त्यामुळे भूमिपुत्र आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या लढ्याला मोठे यश आल्याचे कृती समितीने सांगितले. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा त्याला वाटाण्याच्या अक्षता देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता घुमजाव केला आहे. सत्ता जात आल्याचे चित्र नजरेसमोर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उशिरा शहाणपण सुचल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
नामकरणासंदर्भात दि. २० जून २०२१ रोजी मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली होती. यावेळी ठाकरे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून उठून गेले होते. जर दिबासाहेबांच्या नावाला ठाकरे यांचा विरोध नव्हता मग त्यावेळी त्यांनी विचार का केला नाही, शब्द का दिला नाही असा सवाल उपस्थित होत असतानाच ठाकरे यांचा लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान सर्वपक्षीय लढा असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापचे नेते मात्र दिबांच्या नावासाठी पुढे आले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांनाही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र त्यांनी दिबांच्या नावाला कायम विरोध ठेवला. मात्र आता श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे; परंतु भूमिपुत्रांना माहित आहे या लढ्यात कुणी कुणी साथ दिली आणि कोणाला दिबांचे त्याग विस्मरणात गेले. अशी खोचक टीकाही कृती समितीच्या वतीने करण्यात आली.
याबाबत पनवेल-उरण महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील म्हणाले की, अखिल आगरी परिषदेने दिबांच्या नावाचा मुद्दा सातत्याने २००८ पासून लावून धरला होता. त्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर येथील सर्वपक्षीय कृती समितीने नाना पटोले यांची भेट घेऊन पाठिंबा मागितला होता. तसेच २४ जून २०२१ रोजी झालेल्या सिडको घेराव आंदोलनादरम्यान काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून खा.हुसेन दलवाई त्या आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेनेचे सुभाष भोईर, राष्ट्रवादीचे गुलाब वझे, काँग्रेसचे संतोष केणे व महाविकास आघाडीतील पदाधिकारी व हजारो युवक प्रत्येक वेळी आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु त्या आंदोलनात व्यासपीठावर मविआतील नेतेमंडळी न येण्याचे एकमेव कारण म्हणजे, सर्वपक्षीय कृती समिती म्हणून जे महत्वाचे निर्णय घ्यायचे होते ते भाजपने स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने घेतल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आले.
काँग्रेस नेते अभिजित पां पाटील म्हणाले की, दिबांच्या नावाखाली भाजप आपली राजकीय पोळी भाजत असल्याचे दिसून आल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यासपीठावरून भाजपची साथ सोडली हे खरे आहे. काम बंद आंदोलन हे एका दिवसा पुरते उरकून वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी केवळ दिखावा केला. परंतु त्यानंतर विमानतळाचे काम मात्र सुरूच राहिले. तसेच केंद्रीय मंत्र्यांची कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता त्यांनी दिबांच्या नावासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही हे सर्वांना ज्ञात आहे. 'अभी सब्र रखो, एअरपोर्ट बनने दो, उसके बाद नाम के बारे मे देखेंगे' अशी टोलवाटोलवीची आश्वासने केंद्रीय मंत्री यांनी दिले. मुळातच याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार केंद्राकडे असल्याने भाजपने जनतेची दिशाभूल करू नये. नुकत्याच उलवे येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी दिबांच्या नावासाठी आग्रही भूमिका मांडली. तसेच २४ जून रोजी दिबांच्या स्मृतीदिनी सिडको घेराव आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत हेही सहभागी झाले होते. तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, राष्ट्रवादीचे जि.प. वैजनाथ ठाकूर हेही पूर्वीपासून आंदोलनात सक्रिय आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी दिबांच्या नावाला दिलेला ग्रीन सिग्नल नक्कीच स्वागतार्ह आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये याबाबत आनंदाचे वातावरण आहे.