बँकांनी खरिपाचे 100% उद्दिष्ट दि.31 जुलैपूर्वी पूर्ण करावे-जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

बँकांनी खरिपाचे 100% उद्दिष्ट दि.31 जुलैपूर्वी पूर्ण करावे-जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर


अलिबाग, दि.10 (जिमाका):- आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये बँकांना ठरवून दिल्याप्रमाणे सरकारी, खाजगी, सहकारी (Cooperative) बँकांनी खरिपाचे 100% उद्दिष्ट दि.31 जुलै 2022 पूर्वी पूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. 

     बँकांनी दि.31 जुलै 2022 पर्यंत प्रत्येक शाखेने किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यासाठी किमान 04 शिबिरांचे आयोजन करावे.त्याचबरोबर प्रत्येक शिबिरामध्ये 50 नवीन शेतकरी (प्रधानमंत्री किसान सन्मान योजना) लाभार्थी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेतील,असे नियोजन करावे. विद्यमान किसान क्रेडिट कार्डधारक कर्जदारांना घेतलेल्या कर्जाचे वेळेत परतफेड करून नवीन पीककर्ज घेण्यास प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सूचित केले आहे.

      जिल्ह्याचा मागील 5 वर्षांचा आढावा घेतला असता साधारणपणे 90 टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. परंतू, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण उद्दिष्ट रु.310 कोटी असताना रु.248 कोटी (74%) इतके उद्दिष्ट साध्य झाले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 करिता एकूण खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट रु.272 कोटी इतके ठेवण्यात आले असून दि.31 मे 2022 पर्यंत जिल्ह्यातील बँकांनी रु.72 कोटी 14 लाख (27%) इतके उद्दिष्ट साध्य केले आहे.

     आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी ठेवलेल्या उद्दिष्टामध्ये शेती कर्जासाठी रु.637 कोटी उद्दिष्ट असताना बँकांनी रु.816 कोटी (128%) कर्जवाटप केले आहे. तसेच व्यवसायासाठी रु.1 हजार 962 कोटी उद्दिष्ट असताना बँकांनी रु.2 हजार 630 कोटी (134%) कर्जवाटप केले असून इतर प्राधान्य क्षेत्रासाठी रु.1 हजार 625 कोटी उद्दिष्ट असताना बँकांनी रु.1 हजार 109 कोटी (68%) कर्जवाटप केले आहे. त्याप्रमाणे बँकांनी रु.4 हजार 228 कोटीचे उद्दिष्ट असताना रु.4 हजार 556 कोटी (108%) कर्जवाटप केले आहे.

     आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये असेच सक्रिय काम करून प्रत्येक बँकांनी खरिपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्याच्या विकासामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.