परदेशातील महाराष्ट्र देशा
नवीन पनवेल : मुंबई विमानतळापासून २ हजार ३०० किलोमीटर हवाई अंतरावर वसलेल्या कतार ह्या देशामध्ये १ मे २०२२ चा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये पार पडला. ह्या कार्यक्रमा मध्ये एकुण ९० मराठी लोकांनी पारंपारीक वेष परिधान करून सहभाग घेतला व लहान मुलांपासुन मोठ्या माणसां पर्यंत सर्वांनीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन केले.
नवीन पनवेल येथील संतोष तांबोळी आणि त्यांच्या पत्नी ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. अनुराधा रेणुसे ह्यांनी सर्वांचे स्वागत केले तर दादासो घागरे ह्यांनी महाराष्ट्र दिना कसा व कधीपासुन सुरू झाला ह्याची सर्वांना माहिती सांगितली. अजित कुलये ह्यांनी आपली मराठी भाषा जोपासावी व त्याचे संवर्धन व्हांवे ह्या बद्दल जागृतता निर्माण केली. ३ ते ७ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांनी माझा बाप्पा किती गोड दिसतो हे गाणे सादर केले. ८ ते ११ वयोगटातील मुलांनी जगदंबा, माऊली माऊली, मल्हारी, उगवली शुक्राची चांदणी इत्यादी गाण्यांवर नृत्य केले तर पोवाडा, मराठी कविता, महाराष्ट्र गीते इत्यादींचे गायन सादर केले. विशेष म्हणजे “आम्ही चालवु पुढे हा वारसा” ह्या न्यायाने परदेशातील ह्या लहान मुलांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती शिकुन, जोपासुन ती उत्तम प्रकारे प्रदर्शित देखील केली, त्यामुळे ह्या मुलांचे व त्यांच्या आई वडिलांचे भेटवस्तु देऊन कौतुक करण्यात आले.
लहान मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांनी देखील शाहीर साबळे ह्यांचे गीत, दादासाहेब फाळके ह्यांची चित्रसृष्टी, महाराष्ट्र गीते, पोवाडे, मराठी गाणी, कविता इत्यादीं सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करून अनेक गोष्टींची नवीन माहिती देखील सर्वांना करून दिली. अनेकांनी मराठी कवितांमधून तसेच मनोगत व्यक्त करताना आंबेडकर, शाहु, फुले इत्यादी महाराष्ट्रातील महा पुरूषांचे स्मरण केले व त्यांच्या अतुलनीय कार्याची माहीती दिली. तसेच कतारमध्ये सावित्रीबाई फुले ही शैक्षणिक संस्था सुरू झाल्यामुळे अभिमान देखील व्यक्त केला. स्त्री ही केवळ महाराष्ट्राची, भारताताची नाही तर संपुर्ण जगाची शक्ती आहे, अशा ह्या कतारमधील मराठी स्त्रीशक्तीने एकत्रित येऊन सुंदर असे नृत्य सादर केलेच पण विशेष करून एक उत्तम जागतिक संदेश असलेले गाणे “हिच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे” गायले.
योगेश रेणुसे ह्यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला व प्रश्नोत्तर रूपाने सर्वांच्या डोळ्यांसमोर महाराष्ट्र उभा केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल बुटाला ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियांका संतोष गोळे ह्यांनी केले व नंतर उपस्थित सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे आयोजन योगेश रेणुसे, विशाल बुटाला, अनिल कदम, दादासो घागरे, अजित कुलये, अविनाश गायकवाड यानी केले.