डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राजकीय व आर्थिक स्थैर्य दिले - खा. शरदचंद्र पवार
*लंडन मधील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या इमारतीत संग्रहालय उभारणीसाठी 15 कोटी मंजूर केले - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार*
*धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात सामाजिक न्याय विभाग आणखी उंचीवर जाईल - अजितदादा पवार यांनी केले मुंडेंचे कौतुक*
*झोपडीतील गरीब माणूस आणि मोठे उद्योगपती बाबासाहेबांनी दिलेल्या मतांच्या अधिकाराने समान कक्षेत - जयंत पाटील*
*सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन उच्चपदस्थ झालेले विद्यार्थी आदर्श निर्माण करतील - डॉ. विश्वजीत कदम*
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाचा भव्य कार्यक्रम संपन्न*
*सर्वांना समान संधी केंद्राचे उद्घाटन, गुणवंत विद्यार्थी व यशस्वी उद्योजकांचा गौरव*
मुंबई (दि. 14) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे व्याक्तित्व आहेत ज्यांचे पुतळे देशाच्या प्रत्येक भागात आढळतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान, राज्य घटना दिली हे आपण जाणतोच, पण ते त्यापलीकडे एक अर्थशात्रज्ञ होते, थोर अभ्यासक होते; त्यांच्या दूरदृष्टीमुळेच देशाला राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळाले. पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याची संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यात देखील त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी केले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भाक्रा नांगल धरण उभारल्यानंतर पाण्यातून वीज निर्मिती करून ती वीज कुठल्याही भागात पाठवता येऊ शकते, ही संकल्पना बाबासाहेबांच्या प्रेरणा व संकल्पातून सत्यात उतरली, असेही पूढे बोलताना श्री. पवार म्हणाले.
राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ. आंबेडकर आदर्श मानत, आज आपण या महापुरुषांची जयंती साजरी करून त्यांचे स्मरण करतो, पण त्यापुढे जाऊन त्यांचे आचार व विचार आत्मसात करून समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी पुढे आलं पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम हाती घेतले, शैक्षणिक, उद्योग, नोकऱ्या आदी क्षेत्रात कालानुरूप सकारात्मक बदल घडवून मुंडेंनी विभागाच्या यशाचा टक्का वाढवत, विभागाला एका उंचीवर नेण्याचे काम करतील असा विश्वासही खा. शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास खा. शरदचंद्र पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खा. सौ. सुप्रियाताई सुळे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जयदेव गायकवाड, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, महेबूब शेख यांसह आदी उपस्थित होते.
लंडन मध्ये बाबासाहेबानी वास्तव्य केलेले घर राज्य सरकारने तेथील स्थानिक शासनाकडून विकत घेतले आहे. त्याठिकाणी भव्य संग्रहालय व्हावे, यासाठी निधीची मागणी धनंजय मुंडे व विश्वजित कदम यांनी केली होती, त्यानुसार या कामासाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर केला असून, यु. के. शासनाशी समन्वय साधून हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.
आजचा कार्यक्रम धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे, आजारपणामुळे त्यांना येता आलं नाही, परंतु विभागाच्या माध्यमातून दुर्बल व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी सतत सकारात्मक विचार धनंजय करत असतात, त्यांच्याच प्रयत्नातून साकारत असलेले इंदूमिल येथील बाबासाहेबांचे स्मारक राज्य सरकार वेळेत पूर्ण करेल तसेच यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलताना दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार करताना सर्वांना दिलेल्या मतदानाचा अधिकार यामुळे आज झोपडीतील माणूस आणि मोठमोठे उद्योगपती हेसुद्धा समान कक्ष येतात, ही किमया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधली आहे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. सामाजिक न्याय विभागाने मागील दोन वर्षात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली धाडसी निर्णय घेतले, त्या निर्णयांचे यश आज दिसून येत असल्याचेही श्री. पाटील म्हणाले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज रचनेचा समानता पूर्वक पाया रचून खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला दिशा दिली आज सामाजिक न्याय विभाग त्याच विचारांना अनुसरून काम करत आहे विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी प्रशिक्षणातून घडलेले अधिकारी या सर्व यशस्वी लाभार्थींनी इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे यांनी केले, विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या महत्वपूर्ण योजना व मागील दोन वर्षात घेतलेले महत्वपूर्ण निंर्णय यांची एक चित्रफीत या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमस्थळी बार्टीच्या प्रशिक्षणातून यूपीएससी करून अधिकारी झालेल्या सचिन पवार, सौरभ व्हटकर, श्रीमती अर्चना वानखेडे तसेच मार्जिन मनी योजनेचे लाभार्थी अश्विनी पार्सेकर, वैशाली खांडेकर, सुचिता गवळी, विद्या हंडोरे, कल्याणी शिरोडकर तसेच परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील पवनकुमार सूर्यवंशी, अतुल कांबळे, सुमित कांबळे डिक्कीचे प्रतिनिधी संतोष कांबळे यांचाही गौरव करण्यात आला. डिक्की मार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती संतोष कांबळे यांनी दिली.
राज्यातील 21 हजार महाविद्यालयात सुरू करण्यात येत असलेल्या सर्वांना समान संधी केंद्रांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्याचबरोबर परदेशी शिष्यवृत्ती, यूपीएससी प्रशिक्षण, मार्जिन मनी आदी योजनांचा लाभ घेतलेल्या यशस्वी लाभार्थींचा गौरवही करण्यात आला. कार्यक्रम स्थळी बार्टी कडून सुरू करण्यात आलेल्या बेंचमार्क सर्व्हे व स्वयंसहायता युवक गट उपक्रमांचेही उद्घाटन करण्यात आले तसेच विभागाच्या नवे पर्व व विकास पर्व या दोन माहिती पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. सर्व उपस्थितांचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आभार मानले.