कुसुंबळे ग्रामपंचायतीला "आदर्श ग्रामपंचायत" पुरस्कार प्रदान

 कुसुंबळे ग्रामपंचायतीला "आदर्श ग्रामपंचायत" पुरस्कार प्रदान


पोयनाड (सचिन पाटील)अलिबाग, ता. 25: शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या  तालुक्यातील कुसुंबळे ग्रामपंचायतीने अल्पावधीतच आपल्या कार्यकुशलतेचा दबदबा निर्माण केला आहे. कोरोना कालावधीतील उपाययोजना, आदिवासी कुटुंबांसाठी राबवलेले विविध उपक्रम, बेरोजगार तरुणांसाठी मार्गदर्शन, पिण्याचे शुद्ध पाणी या सर्व विकास योजनांसह गावा गावातील स्वच्छता पाहून या गावात येणारे सर्वांणाच या ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रभावित होतात. याचमुळे दैनिक नवराष्ट्रच्या वतीने 'आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार-2022' देऊन या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात शनिवार (ता.26) रोजी सकाळी 10.00 वाजता पुरस्कार सोहळा होत असून या सोहळ्यासाठी जिल्हाभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना लोभी, उपसरपंच रसिका केणी व सर्व सदस्यांना पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत.

      अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली कुसुंबळे ग्रामपंचायतीने अनेक विकास योजना राबवून त्या पुर्ण केल्या. याचीच दखल दैनिक नवराष्ट्रने घेतली असून या ग्रामपंचायतीची 'आदर्श ग्रामपंचायत' म्हणून निवड केली आहे. कोरोना कालावधीत कुसुंबळे ग्रामपंचायतीने राबवलेल्या अनेक उपयायोजनांमुळे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोना नियंत्रणात राहण्यास मदत झाली. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या दरम्यान रोजगार गमावलेल्या मजूरांना रोजीरोटी कशी मिळवावी या समस्येमध्ये राजा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने मोलाचे काम केले. यासाठी कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पोलिस पाटील अंगणवाडी सेविका व अशा सेविका यांच्या सोबत कोरोना या महाभयंकर रोगाला रोखण्यासाठी कशा पध्दतीत उपाययोजना व नियंत्रण करता येतील यासाठी विविध उपाययोजना राबवल्या होत्या.  कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळेल यासाठी ग्रामपंचायतीने बारकाईने उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे येथील पाणीटंचाई संपुष्ठात येण्यास मदत झाली आहे. यासह आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यासाठीही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांच्या मदतीने केलेल्या उपाययोजना यशस्वी करुन दाखवल्या आहेत.