“समान संधी केंद्राचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा."- समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे
*अलिबाग,दि.21(जिमाका):-* समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांची गुणवत्ता वाढीसाठी व्यासपीठ निर्माण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी "समान संधी केंद्र या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी केले.
दि.17 फेब्रुवारी 2022 रोजी बेलापूर येथील भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या कॉलेजमध्ये समान संधी केंद्राचे उद्घाटन डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.विलासराव कदम, संचालक, भारती विद्यापीठ, प्राचार्य डॉ.अंजली कळसे, श्री.अरुण माने, श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मुंबई विभाग व श्री.बलभिम शिंदे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे हे उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक व सहाय्यक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेवून, महाविद्यालयातच समान संधी केंद्र हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय नुकताच सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. सदर समान संधी केंद्रात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहीत करणे, रोजगार प्राप्ती किंवा उद्योगजगता व व्यावसायिक होण्यासाठी कोशल्य शिक्षण याबाबत सर्व समावेशक मार्गदर्शक विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.