नागरिकांनी दिपावली उत्सवानिमित्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याविषयी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आवाहन

                                         

नागरिकांनी दिपावली उत्सवानिमित्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याविषयी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आवाहन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :- यावर्षी दि. 2 ते 6 नोव्हेंबर, 2021 दरम्यान दिपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोविड रोगाचा प्रादूर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्वधर्मीय सण / उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नाग‍रिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

        कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेण्यात यावी.

      दिपावली उत्सवादरम्यान कपडे/फटाके/दागदागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यांवर गर्दी होत असते. तथापि, नागरिकांनी शक्यतो गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन करोनाचा संसर्ग / संक्रमण वाढणार नाही.

दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतीषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. करोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा त्रास होण्याची भीती आहे, ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी यावर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.

      "ब्रेक द चेन" अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार करोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरीदेखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करताना मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी, शक्यतो अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.

      सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

       कोविड- 19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.