सुलेखनकार श्री.अच्युत पालव यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केला सन्मान
समस्त नवी मुंबईकरांच्या वतीने हा सन्मान असल्याची श्री.अच्युत पालव यांनी व्यक्त केली भावना
भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये जगप्रसिध्द सुलेखनकार श्री.अच्युत पालव यांना ‘पद्मश्री’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन करीत यथोचित सन्मान केला. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे उपस्थित होते.
सुलेखनकार श्री.अच्युत पालव यांना अत्यंत मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे ही नवी मुंबई शहराचा नावलौकिक वाढविणारी गोष्ट असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे अशी भावना व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईच्या शहर सुशोभिकरणात श्री.अच्युत पालव यांनी दिलेल्या मौलिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेली चित्रकविताभिंतींची अभिनव संकल्पना श्री.अच्युत पालव यांच्या कविता सुलेखनातून यशस्वी झाली होती. त्याचे कौतुक राज्यभरातून झाले. विशेष म्हणजे याची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आपल्या सुलेखनातील विद्यार्थ्यांसह ते मागील अनेक वर्ष वाशीच्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रदर्शनी भागात मराठी सुलेखनाचे प्रदर्शन महानगरपालिकेच्या सहयोगाने आयोजित करीत असतात. स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ते नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्युटिफिकेशन आयकॉन आहेत.
चाळीसहून अधिक वर्षे समर्पित भावनेने सुलेखनासाठी व त्यातही मोठी लिपीसाठी अनमोल योगदान देणा-या श्री.अच्युत पालव यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाचा पद्मश्री पुरस्काराने यथोचित गौरव होताना आपण नवी मुंबईचे नागरिक आहोत याचा अभिमान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. एखादी गोष्ट निष्ठापूर्वक करीत राहिलो तर त्यात यश निश्चितपणे मिळते असे स्वानुभवातून मत व्यक्त करीत श्री.अच्युत पालव यांनी पद्मश्री पुरस्कारामुळे सुलेखन क्षेत्रात येणा-या नव्या पिढीला प्रोत्साहन मिळेल, नवी दिशा मिळेल असे सांगितले. भारत हा लिपीप्रधान देश असून विविध लिप्यांमध्ये काम करण्यासारखे भरपूर आहे, त्यातली मिठास पकडली पाहिजे, मग लिप्यांचा वापरातून माणसे जोडली जातील असे ते म्हणाले.