कूळ वहिवाट कायद्यानुसार मासेमारी जमिनीवर मच्छिमारांचा अधिकार असून मच्छिमारांच्या 400 हेक्टर मासेमारी जमिनीवर JNPT चे अतिक्रमण

कूळ वहिवाट कायद्यानुसार मासेमारी जमिनीवर मच्छिमारांचा अधिकार असून मच्छिमारांच्या 400 हेक्टर मासेमारी जमिनीवर JNPT चे अतिक्रमण:मच्छिमार पुनर्वसन व नोकरी पासून वंचित





उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी सांगितल्यानुसार  JNPT(JNPA ) ने महाराष्ट्र शासनाच्या  महसूल विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता सन 1984 पासून उरण तालुक्यातील शेवा कोळीवाडा हद्दीतील समुद्राच्या मासेमारी जमिनीवर भराव करुन जमीन तयार केलेली आहे. आणि त्या जमिनीचा सुधारित मौजे शेवा कोळीवाडा  गाव नकाशा तयार करण्याची मागणी JNPT(JNPA )  व्यवस्थापनाने जुलै 2017  रोजी मा. जिल्हाधिकारी रायगड यांच्या कडे केलेली होती.
JNPT(JNPA ) च्या मागणीनुसार   मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी दिनांक 09 जुलै 2021 रोजीच्या आदेशानुसार मा. जिल्हा भूमि अधीक्षक रायगड अलिबाग यांनी मा. उपअधीक्षक भूमि अभिलेख उरण यांना कळविले होते त्यानुसार त्यांनी शेवा कोळीवाडा गाव नकाशात समुद्रातील भराव केलेल्या जमिनीची वाढ करून आकारबंद, नकाशा व  सात बारा तयार केलेला आहे. आणि त्या वाढ केलेल्या जमिनीला सर्व्हे नंबर 217 दिलेला आहे. त्याचे क्षेत्र एकूण 400 हेक्टर असून भोगवटदार महाराष्ट्र शासन आहे. 
मा. उपाध्यक्ष JNPT(JNPA ) यांच्या मागणीवरून मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी सात बारा सर्वे नंबर 217 भोगवटदार महाराष्ट्र शासनाच्या नावे नोंद असलेली 400 हेक्टर जमीनिचा सातबारा JNPT च्या नावे हस्तांतर करत आहेत.
या संशयास्पद मासेमारी जमीन हस्तांतर प्रकरणी सखोल न्यायालयीन चौकशीची मागणी तसेच सदरच्या अनैतिक व्यवहारात गुंतलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी शेवा कोळीवाडा विस्थापित गाव कमिटीने केली आहे.


कोट (चौकट ):-

हनुमान कोळीवाडा पुनर्वसनच्या बाबतीत कोणत्याही ठोस उपाययोजना शासनाकडून केल्या जात नाहीत. शेवा कोळीवाडा गावाचे शासनाच्या माप दंडानुसार पुनर्वसन व विस्थापितांना रोजीरोटी साठी नोकरी च्या नावाने JNPT(JNPA ) प्रशासन व  जिल्हा प्रशासनातर्फे हनुमान कोळीवाडा गावातील विस्थापितांचि फसवणूक केली जात आहे.तसेच जेएनपीटी प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता सन 1984 पासून उरण तालुक्यातील शेवा कोळीवाडा हद्दीतील समुद्राच्या मासेमारी जमिनीवर भराव करून जमीन तयार केली आहे.हे सर्व भराव बेकायदेशीर आहे. मच्छिमारांना विश्वासात न घेता केलेले काम आहे.
- ग्रामसुधारणा मंडळ  हनुमान कोळीवाडा