भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू.. घरोघरी तिरंगा फडकवू..!

 विशेष लेख

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू..

घरोघरी तिरंगा फडकवू..!

“हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा”


भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतविलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि.13 ऑगस्ट ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानुषंगाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन परिपत्रकान्वये सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” अभियानासाठी ग्रामीण विकास विभागास राज्य समन्वय संस्था म्हणून नामनिर्देशित केले आहे. शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने या उपक्रमाबाबतच्या दिलेल्या महत्वाच्या सूचना जाणून घेवू, या लेखाच्या माध्यमातून..

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि.13 ऑगस्ट ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय / निमशासकीय / खाजगी अस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे.

तिरंगा हा नि:शुल्क असणार नाही, नागरिकांनी तो स्वच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात यावे. प्रत्येक जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेला आवश्यक असलेल्या ध्वजांची संख्या निश्चित करणे महत्त्वाचे आहे.

या उपक्रमासाठी ग्रामीण भागात जवळपास 1.46 कोटी कुटुंबे / घरे असून इतर कार्यालये, संस्था मिळून 1.50 कोटी ध्वज फडकवता येईल असा अंदाज आहे.

विविध स्तरातून सहकार्य मिळविण्यासाठी शाळा-कॉलेजेस, एनसीसी, एनएसएस, स्वयंसहाय्यता समूह, युवा मंडळ इत्यादींमधून “तिरंगा वॉलेंटियर्स” म्हणून नियुक्त करणे, तसेच स्थानिक स्तरावरून पालकमंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी सदस्य, इतर प्रतिष्ठित नागरिक, खेळाडू, अधिकारी यांच्याद्वारे नागरिकांना “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” अभियानाबाबत आवाहन करण्यात यावे.

प्रत्येक नागरिकाने भारतीय ध्वज संहिता, 2006 चे पालन करावे, याकरिता नागरिकांना माहिती देण्यात यावी. या लिंकद्वारे भारतीय ध्वज संहिता, 2006 ची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामपंचायत व विविध सरकारी कार्यालये / संस्था हे साठवणूक आणि विक्री केंद्र असतील.

महाराष्ट्रात खालीलप्रमाणे तिरंगा झेंडा पुरवठादार आहेत, जेथून ठोक स्वरुपात आपण झेंडा खरेदी करू शकता.

1.  खादी ग्रामोद्योग आयोग (KVIC)

2. भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्या. (NCCF) केंद्र सरकार उपक्रम.

3. GEM पोर्टल 

4. स्थानिक विक्रेते, स्वयंसहाय्यता महिला समूह इ. 

5. Indiamart सारखी ऑनलाइन खरेदी

6. याशिवाय मुंबईत द फ्लॅग कंपनी वसई, द फ्लॅग शॉप इ.

तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून कळविण्यात आलेले काही तिरंगा पुरवठादारांचे संपर्क: श्री.कबीर कुमार- 7091472555, 8800265779, ईमेल- aniratcontracts@gmail.com याप्रमाणे असून मुंबईतील आणखी एक पुरवठादार श्री.पुष्कर नाईक- 8800488030, 9869588325 हे असून यांनी  NCCF आणि खरेदीदार यांच्यात समन्वय साधून तालुकास्तरावर झेंडे वाटपाची तयारी दर्शविली आहे.

वरील विक्रेत्यांना किंवा स्थानिक विक्रेत्यांना आपल्या जिल्ह्यातील आवश्यक घरांच्या संख्येनुसार पुरवठा आदेश दिला जाऊ शकतो. 

तिरंगा झेंडा साठवणूक केलेल्या ग्रामपंचायत येथून स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तिरंगा खरेदी करण्याबाबत ग्रामपंचायत क्षेत्रात जाणीवजागृती निर्माण करून “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” उपक्रम यशस्वी करण्यात यावा. 

“हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील घरांची, संस्थाची निश्चिती, त्यासाठी आवश्यक झेंडेची संख्या, त्यांची खरेदी, वितरण, उत्पादन, प्रत्यक्षात झेंडे लावणे इ. सर्व बाबींची पूर्तता, संपूर्ण नियोजन जिल्हास्तरावरून करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. 

या उपक्रमाची जिल्हास्तरीय कार्यान्वयन समिती पुढीलप्रमाणे:-

अध्यक्ष: जिल्हाधिकारी

सह-अध्यक्ष: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

उपाध्यक्ष: पोलीस अधीक्षक

सदस्य: विद्यापीठाचे कुलसचिव द्वारा प्रतिनिधी, नगरपालिका मुख्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, महाव्यवस्थापक-जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी, MSRLM समन्वयक.

सदस्य सचिव: जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

या उपक्रमाचे नियोजन पुढीलप्रमाणे असेल:

तरी जिल्ह्यात “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे  यांनी केले आहे.


मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग


Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image