रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पदवीदान समारंभ संपन्न
पनवेल(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज (शनिवार, दि. १२) पदवीदान समारंभ संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौंसिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर होते. तर भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील पदवीधर व पदव्युत्तर स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झालेल्या सोहंळ्याच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्याना शिक्षणाचे महत्व विशद केले. पदवी प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना आदर्श नागरिक म्हणून जीवन कसे जगता येईल यासाठी प्रयत्न करा व इतर गरजूंना मदतीचा हात द्या असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी विद्यार्थ्याना महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे देशाच्या विकासामध्ये असलेले योगदान व त्याग तसेच देश महासत्ता बनण्याची जी स्वप्ने पाहतो आहे त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांनी केलेले कार्य किती महत्वाचे आहे याची विद्यार्थ्यांना आठवण करून दिली. शिक्षणातून मिळणाऱ्या जीवन मूल्यांचा यथायोग्य वापर प्रत्यक्ष जीवनामध्ये करणे आवश्यक आहे. जीवनामध्ये येणा-या अडचणींवर मात करून पुढे जाणे महत्वाचे आहे. २१ व्या शतकातील आवाहने, जागतिकीकरण या सारख्या गोष्टींना आजच्या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एन.आर.मढवी, डॉ आर ए. पाटील, उपप्राचार्य ए.जी.रोकडे तसेच विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर.ए. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रफुल्ल वशेणीकर, प्राध्यापिका सोनू तन्वर व प्रा. प्रवीण गायकर यांनी केले.