तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमुळे वायु प्रदुषण होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
पनवेल(हरेश साठे) तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमुळे वायु प्रदुषण होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले असून तळोजा परिसरातील दुर्गधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण १३ उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे, असे लेखी उत्तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमार्फत सोडण्यात येणा-या विषारी वायुमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे जानेवारी २०२२ मध्ये निदर्शनास आले असून या औद्योगिक वसाहतीतील ९४० कारखान्यांपैकी निम्म्याहून अधिक कारखान्यांतून रासायनिक सांडपाणी व विषारी वायुमुळे प्रदुषण होत असल्याने येथील नागरिकांना दमा, क्षयरोग, छातीत दुखणे तसेच डोळयांचे विकार होत असून मुलांच्या शारीरीक वाढीवर परिणाम होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदुषण करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असतानाही कारखानदार रात्री-अपरात्री विषारी वायु सोडत आहेत. या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या व प्रदुषणाला कारणीभूत ठरणाऱ्या कारखान्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दाखल केला होता.
या प्रश्नावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, पनवेल महानगरपालिका यांच्या दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रान्वये वायु प्रदूषणामुळे श्वसन दाह चे तसेच दम्याचे आजाराचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून आलेले नाहीत. मा. राष्ट्रीय हरित लवाद येथे दाखल झालेली याचिका (क्र. १२५/२०१८) ही प्रामुख्याने तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सामाईक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदान केलेल्या संमती पत्रामधील मानकांचे पालन करत नसल्याबद्दल आहे व सद्यस्थितीत न्यायप्रविष्ठ आहे. सदर याचिकेमध्ये हवा/वायू प्रदुषणाबाबत बाबीचा समावेश नाही.तथापि, वायू प्रदुषणाच्या तक्रारीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे रात्रीची गस्त घातली जाते व तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योग मंडळाने प्रदान केलेल्या संमती पत्रामधील हवा व जल प्रदूषण नियंत्रण विषयक अटी व शर्तीचे पालन करतात किंवा कसे यांची शहानिशा केली जाते. मंडळाकडून तळोजा औद्यगिक क्षेत्रामध्ये रात्रीची पहाणी करण्यात येते व दोषी कारखान्यावर नियमीत कारवाई करण्यात येत असून तळोजा परिसरातील दुर्गधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण १३ उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे.यामध्ये मागील ०१ वर्षामध्ये ०६ उद्योग बंदचे आदेश, ०१ प्रस्तावित निर्देश, ०६ कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे