महाविकास आघाडीचा महाबंद, शटर डाऊन,बंदला पनवेलमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग-लखीमपूर घटनेवर महाविकास आघाडी आक्रमक

महाविकास आघाडीचा महाबंद, शटर डाऊन,बंदला पनवेलमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग-लखीमपूर घटनेवर महाविकास आघाडी आक्रमक



पनवेल (प्रतिनिधी)-उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद 'ची हाक दिली होती. आज ११ ऑक्टोबर रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी बंद पाळण्याचे आवाहन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे केले होते. या महाविकास आघाडीच्या महाबंदला पनवेलमधील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा बंद यशस्वी केला. महाविकास आघाडीच्यावतीने आज सोमवारी सकाळी पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येऊन भाजपच्या क्रूर सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी पनवेल उरण महाविकास आघाडीचे नेते तथा शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, काँग्रेसचे आर.सी.घरत, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंग, प्रभाकर कांबळे, राष्ट्रवादीचे आनंद भंडारी, यतीन देशमुख, काँग्रेसचे वैभव पाटील, बबन विश्वकर्मा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लखीमपूर घटनेचा निषेध करत राज्यात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा घोषणा देऊन एक प्रकारे भाजप सरकारचा निषेध नोंदविला. भाजपचं सरकार शेतकऱ्यांशी क्रूरपणे वागत आहे. त्यांचे आंदोलन चिरडत आहे. लखीमपूर घटनेतील आरोपींना अटकही करण्यात आली नाही. लखीमपूरची घटना निषेधार्ह असून त्याविरोधात पाळण्यात येत असलेल्या बंदमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या क्रूरतेचा निषेध नोंदविण्यासाठी सदर बंद यशस्वीपणे पार पडला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज पनवेलमध्ये आक्रमक पवित्रा घेतला. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. राज्यातील सर्व घटकांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन महाविकास आघाडीकडून करण्यात आवाहनाला सहकार्य केले. आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पनवेलमधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलोनी, कामोठे, कळंबोली, तळोजा आणि खारघरमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आपली आक्रमकता दाखवून भाजप सरकारचा निषेध नोंदविला.

कोट  
पनवेल उरण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वत्र एकत्र येऊन या बंदबाबत मिटिंग घेऊन वरिष्ठ नेत्यांच्या आवाहनाला कशा प्रकारे बंद यशस्वी करावा याबाबत चर्चा करण्यात आली. आणि येथील व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना आम्ही पत्र देऊन आवाहन केले. सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे. हा बंद आमचा महाविकास आघाडी सरकारचा नसून देशातील तमाम जनतेचा आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय हा आम्ही देशातील कोणत्याही ठिकाणी सहन करणार नाही, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
- बबनदादा पाटील
अध्यक्ष, पनवेल उरण महाविकास आघाडी

कोट

लखीमपूर येथील घडलेली घटना ही देशातील नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारी आहे, आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत असताना शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत याची आम्हाला जाणीव आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात देश वाचविणाऱ्या शेतकऱ्यांनाच असुरक्षित वाटत असेल तर हे देशाचे मोठे दुर्भाग्य आहे.
- प्रभाकर कांबळे
पनवेल शहर जिल्हा सहचिटणीस, शेकाप

कोट

दिल्लीमध्ये गेल्या ११ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे आणि भाजपचे केंद्र सरकार हे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा उडवीत आहे, गेले वर्षभर शेतकऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. शांततेत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनातही आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमीच राहिलो आहे, मात्र नुकतीच लखीमपूर येथे घडलेली दुर्घटना निषेधार्थ असून या भाजप सरकारचा देशातील नागरिकांनी समाचार घेणे गरजेचे आहे. आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो बंद पुकारलेला आहे, हा बंद नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आहे.
- प्रीतम म्हात्रे
विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका

कोट

देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे, अत्याचार वाढले मात्र याबाबत भाजप सरकार याबाबत उदासीन राहिले आहे. देशासह राज्यात कोरोनाचे विदारक रूप समोर आले, मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने नागरिकांना या महाभयंकर रोगातून बाहेर काढून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी लीलया पेलली आहे. मात्र भाजप सरकारने देशवासीयांच्या भावना कधी समजून घेतल्या नाहीत याउलट शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना त्यांनी पाठीशी घातले आहे, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
- योगेश तांडेल
पनवेल तालुका संपर्क प्रमुख, शिवसेना