ऑपरेशन अभ्यास" मॉक ड्रिल करून पोलीस प्रशासनाने दिला जनतेला सतर्कतेचा इशारा
उरणच्या जनतेने केले प्रशासनास सहकार्य
मॉक ड्रिल द्वारे उरण मध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित.
मॉक ड्रिलचे उरणच्या नागरिकांनी केले सर्वत्र स्वागत.
उरण मध्ये सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त, कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घेण्यात आली खबरदारी.
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. तसेच भारतातील अति महत्वाच्या १६ ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहे. त्या १६ ठिकाणापैकी महाराष्ट्रातील मुंबई, तारापूर, उरण या महत्वाच्या शहराचे नावे पहिल्या यादीत आहेत. यावरून या शहराचे महत्व अधोरेखित होत आहे.या ठिकाणी सायरन वाजवून मॉक ड्रिल घेण्यात आले.
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले होते.या मॉक ड्रिलच्या दरम्यान दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला.उरण शहरातील तहसिल कार्यालय उरण, ओएनजीसी कॉलनी,ग्रुप ग्रामपंचायत चाणजे, जिटीपीएस कंपनी बोकडविरा, बारमर लॉरी, भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी कोप्रोली, बल्क गेट कंपनी मोरा या ठिकाणी सायरन वाजविण्यात आले. तर एन.आय. स्कूल, पंचायत समिती, उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल झाली.नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्रीय गृह विभागाच्या सूचनेनुसार उरण शहरात ब्लॅक-आऊट प्रकियेचीची रंगीत तालीम दि ७ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता घेण्यात आली असून त्यादरम्यान उरण शहरातील विद्युत पुरवठा १० मिनिटांसाठी खंडित केला गेला. त्यादरम्यान नागरिकांनी घरातील इन्व्हर्टर, जनरेटर व प्रकाश निर्माण करणारी रिचार्जेबल उपकरणे आदी वस्तूंचा वापर करणे टाळले. यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनास सहकार्य केले आहे.मॉक ड्रिलचे उरण मध्ये सर्वत्र स्वागत करण्यात आले असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.उरण शहरात एन आय हायस्कूल येथे दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल करण्यात आले यावेळी खासदार धैर्यशील पाटील,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी,न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ विशाल नेहूल,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक समीर जाधव, तहसीलदार उद्धव कदम,मोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे, इंडियन आर्मीचे अधिकारी सन्नी राणा,एनसीसी चे ट्रेनिंग ऑफिसर संजय पाटील, कॅप्टन आर एस जमनुके, फायर ब्रिगेड चे अधिकारी कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
============================== ==========
उरण शहराची निवड का करण्यात आली -
उरण हे समुद्र किनारी वसलेले शहर असून औद्योगिक दृष्टीने हा शहर महत्वाचा आहे. काही वर्षांपूर्वी समुद्र मार्गे दहशतवादी आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आताही दहशतवादी समुद्र मार्गे मुंबई, तारापूर, उरण भागात येण्याची व हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उरण मध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. मोठे मोठे प्रकल्प आहेत. यामुळे उरणला दहशत वादयाकडून मोठया प्रमाणात धोका आहे. जागतिक दर्जाचे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर म्हणून जेएनपीटी बंदर प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात मोठे हे बंदर आहे. जागतिक व्यापाराची येथे मोठया प्रमाणात उलथा पालथ होते. उरण मध्ये ओएनजीसी, बीपीसीएल, जिटीपीएल असे अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यांच्याही सुरक्षिततेला मोठा धोका आहे. इंडियन नेव्ही समुद्र किनारी कार्यरत असून येथे विविध शस्त्र, बॉम्ब गोळे, रॉकेट, स्फ़ोटक पदार्थ बनविले जातात.उरण मध्ये मोठे शस्त्राचे भांडार आहे. त्यामुळेही उरणला मोठा धोका आहे. तसेच अनेक मोठ मोठे प्रकल्प आहेत. त्यांनाही धोका आहे. उरण मध्ये सुंदर समुद्र किनारा असल्यामुळे बाहेरून पर्यटक मोठया प्रमाणात येतात. दळण वळणाच्या दृष्टीनेही उरण अत्यंत महत्वाचा आहे. सागरी मार्ग, रस्ते महामार्ग, रेल्वे मार्ग यांचे विस्तुत जाळे असल्याने उरण परिसरात मोठया प्रमाणात दळणवळण होते. प्रवाशांची संख्याही जास्त आहे.देश विदेशातून पर्यटक उरण मध्ये येतात त्यामुळे उरणची सुरक्षितता महत्वाची आहे.
============================== ==========
कोट (चौकट )
ऑपरेशन सिंदूरला उरण मधील नागरिकांचे जाहीर समर्थन व पाठिंबा.
जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांना आपले जीव गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने बुधवार दिनांक ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री पाकव्याप्त कश्मीर मधील ९ दहशतवादी तळावर क्षेपणाशस्त्रे डागली. भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशन सिंदूर नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने केलेल्या या क्षेपणाशस्त्र हल्ल्यात २ लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या कारवाईत पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त कश्मीर मधील दहशतवादयांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्लाचा कट झाला व त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीर मधील दहशतवाद्याच्या ९ ठिकाणी लक्ष्य केले . या कृत्याचे भारतीयांनी समर्थन केले असून भारताला दहशतवाद विरोधी कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. उरण मधील नागरिकांनीही दहशतवाद विरोधात लढण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा व समर्थन दिल्याचे चित्र उरण मध्ये पहावयास मिळाले.व्हाट्सअप फेसबुक ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून उरणकरांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तान मधील दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.
============================== ==========
मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोड वर
पहलगाम दहशत हल्ल्याच्या पार्श्व भूमीवर उरण मध्ये आयोजित केलेल्या मॉर्क ड्रिलच्या पार्श्वभूमीवर उरण मधील सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोड वर होत्या. उरण मधील उरण नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय, उरण पोलीस स्टेशन, महसूल कार्यालये, सिडको कार्यालये, उरण मधील ग्रामपंचायत आदी महत्वाचे शासकीय कार्यालयांनी गृह मंत्रालय व जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत, जनतेत जनजागृती करत मॉर्क ड्रिल मध्ये सामील झाले. सर्वच शासकीय कार्यालयांनी मॉक ड्रिल बाबतीत पूर्ण पाठिंबा व जाहीर समर्थन केले असल्याचे दिसून आले.सर्वच शासकीय कार्यालये अलर्ट मोड असल्याचे यावेळी दिसून आले.
============================== ==========
कोट (चौकट ):-
उरण मध्ये एन आय हायस्कूल येथे मॉक ड्रिल घेण्यात आले. अन्य ठिकाणी सायरन वाजविण्यात आले. ज्यावेळी एअर स्ट्राईक होतो त्यावेळी सायरन वाजविले जातात. ज्यावेळी युद्ध जन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळी सायरन वाजवून नागरिकांना अलर्ट केले जाते. मॉक ड्रिल घेण्याचा उद्देश नागरिकांना सतर्क करणे व काय काळजी घ्यावी, कोणती काळजी घ्यावी याची माहिती देणे आहे.एकंदरीतच मॉक ड्रिल उरण मध्ये यशस्वी झाला.
- डॉ. विशाल नेहूल, न्हावा शेवा बंदर विभाग, सहाय्यक पोलीस उपायुक्त,
============================== ==========
जेव्हा जेव्हा युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते अशा वेळी मॉक ड्रिल घेतले जाते. या मॉक ड्रिलचे चांगले व योग्य नियोजन केले गेले. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन यावेळी करण्यात आले. या मॉक ड्रिल मधून नागरिकांपर्यत योग्य तो संदेश पोहोचला आहे. भविष्यात कोणतेही दुर्घटना, अनुचित प्रकार घडू नये म्हणून उरण मधील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
- जितेंद्र मिसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे
============================== ==========
केंद्र शासन व मा.जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या आदेशानुसार, मार्गदर्शनानुसार उरण मध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळावी याविषयी डेमो झाला. अनेक नागरिकांनी हा डेमो बघितला. या डेमो मुळे नागरिकांना युद्धात, युद्ध जन्य परिस्थितीत काय करावे, काय करू नये याविषयी माहिती मिळाली आहे. असे डेमो सुरक्षिततेच्या होणे ही काळाची गरज आहे.
- उद्धव कदम,तहसीलदार, उरण
============================== ==========
उरण हे केंद्रबिंदू आहे. अनेक महत्वाचे प्रकल्प येथे आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा महत्वाची आहे.आलेल्या कोणत्याही परिस्थितीला उरणकर सज्ज आहेत. कोणतेही परिस्थिती येऊ दे उरणकर लढ्याला सामोरे जायला तयार आहेत.देशासोबत चालायला उरणकर सज्ज आहेत हे या मॉक ड्रिल मधून सिद्ध झाले आहे.आम्ही नेहमी भारता सोबत आहोत.
- महेश बालदी, आमदार, उरण विधानसभा मतदार संघ
============================== ==========
मॉक ड्रिल बाबत उरणच्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मॉक ड्रिल व युद्ध जन्य परिस्थितीत नागरिकांनी काय करावे, काय करू नये याची माहिती देण्यात आली. उरण मध्ये मॉक ड्रिल यशस्वीपणे संपन्न झाला.
- समीर जाधव, मुख्याधिकारी तथा प्रशासक उरण नगर परिषद.
============================== ==========
देशातील महत्वाच्या घडामोडी, मॉक ड्रिल या संदर्भात तसेच युद्ध जन्य परिस्थिती संदर्भात मी कोणतेही भाष्य करू शकत नाही. तसे मला वरिष्ठ अधिकाऱ्यां कडुन सूचना आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने आज उरण मध्ये मॉक ड्रिल करण्यात आले आहे. इतर कोणतेही माहिती मी देऊ शकत नाही.
- सन्नी राणा, इंडियन आर्मी, सैनिक
============================== ==========
भारताने करत असलेल्या ऑपरेशन सिंदूरचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे. दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले गेले पाहिजे. उरण मध्ये मॉक ड्रिल झाली.जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे उत्तम कृती आहे. आता वेळ आली आहे की प्रत्येक नागरिकांनी सैनिक बनवून लढण्याची. सीमेवर आपले जवान, सैनिक बांधव प्राणाची आहुती देत आहेत. दहशत वाद्यांशी लढत आहेत. तेंव्हा प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य बनते की भारतीय सैनिकांना पाठिंबा देणे. भारतात अंतर्गत प्रशासनास सर्वांनी सहकार्य करून दहशत वाद्यांना जशास तसे उत्तर द्यावे.
- सुधाकर पाटील,अध्यक्ष उरण सामाजिक संस्था, उरण.
============================== ==========
भारतीय लष्कराने पाकिस्तानात एयर स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त गेल्या बदल भारतीय सैन्याचे अभिनंदन. आज देशभरात होणाऱ्या तसेच उरण तालुक्यात होणाऱ्या मॉक ड्रिल मध्ये उरण मधील जनतेने प्रशासनाला सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार. आगामी काळात युद्धजन्य परिस्थीती सतर्क राहून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल शासकीय यंत्रणेला च्या संपर्कात राहून जनतेने नेहमी प्रशासनाला सहकार्य करावे .प्रशासकीय यंत्रणे कडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.असे मी आवाहन करतो
- सचिन डाऊर -जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उरण
============================== ==========
मॉक ड्रिल हे जनतेच्या दृष्टीने अंत्यत महत्वाची बाब आहे. असे मॉक ड्रिल जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वारंवार व्हायला पाहिजे. नागरिकांनी आणीबाणीच्या परिस्थिती कसे वागावे,आणी बाणी किंवा उद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी कसे राहावे, काय काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण नागरिकांना मिळाले पाहिजे. देशाच्या संरक्षण साठी, देशाच्या उन्नती साठी प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. देशाच्या जडणघडण मध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभाग नोंदवावा. दहशत हल्याला जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे.
- दिपक ठाकूर, उरण तालुका प्रमुख, शिवसेना शिंदे गट
============================== ==========
भारतीय सैन्या कडुन करण्यात आलेली कारवाई ही पाकिस्तान प्रेरित दहशत वादी कारवायांना चोख प्रत्युत्तर आहे. भारतीय सैन्याने कठीण काळात सुद्धा अंत्यत चोख पद्धतीने कामगिरी बजावत फक्त दहशतवादी स्थळांना निशाणा केले आहे. ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याच्या शौर्य, पराक्रम कुशलता व नैतिकतेचे प्रतीक आहे. उरण मध्ये आयोजित केलेल्या मॉक ड्रिलला संपूर्ण जनतेचे पाठिंबा आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भविष्यात होणाऱ्या सर्वच उपक्रम, मॉक ड्रिलला माझा, जनतेचा, नागरिकांचा पूर्ण पाठिंबा राहिल.
- प्राध्यापक निरंतर सावंत, उरण
============================== ==========
चाल रं गड्या रस्त्यावर
नाहीस तू एकटा
आम्ही आहोत सोबत
घेऊन प्रकाशाचा दिवटा
आज भारतीय सैन्य दलाने जो पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जो हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्हा साहित्यिकांना अभिमान आहे. भारतीय सैनिक जरी सीमेवर एकटे लढत असले तरी तुम्ही एकटे नाहीत आम्हा जनतेचा तुम्हाला पाठिंबा आहे.खरंतर दहशतवाद ही समस्या एकट्या भारताची नसून संपूर्ण जगाची आहे.देशाच्या एकात्मतेसाठी या दहशत वादी अड्ड्यांना त्यांनी नाक वर काढण्या अगोदरच ठेचायला हवे.आज केंद्रीय गृह विभागा तर्फे ऑपरेशन अभ्यास म्हणून माॅकड्रील कार्यक्रम उरण शहरात आयोजित करण्यात आला होता . या बाबत शासनाचा दूरदृष्टीकोन हा हेतू महत्वपूर्ण मानावा लागेल.उरणातील कार्यरत असलेल्या विविध कंपन्या, सागरी किनारा, जागतिक बंदर आणि इथे देशी परदेशी लोकांची होणारी वर्दळ पाहता सुरक्षितता या दृष्टीने माॅकड्रील महत्वाचे आहे.
- मच्छिंद्रनाथ म्हात्रे- जेष्ठ साहित्यिक तथा अध्यक्ष उरण कोकण मराठी साहित्य परिषद