तळोजा ग्रामीण भागातील महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
पनवेल (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या दुग्धव्यवसायांपासून ते शेतीसाठी उजाड जमीन सुपीक करण्यात आणि गावकऱ्यांना उद्योजक बनवण्यात दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या ‘इशान्य फाउंडेशन’ या सीएसआर विभागाच्या माध्यमातून सन्मान आणि स्वावलंबनाचे महत्वाचे पाऊल उचलले. त्या अनुषंगाने तळोजा परिसरातील गावांमधील ग्रामस्थांच्या जीवनात आर्थिकदृष्टया सबलीकरणासाठी रोजगाराचे सकारात्मक प्रोत्साहन मिळाले आहे.
वर्षानुवर्षे, दीपक फर्टिलायझर्सच्या तळोजा येथील कंपनी जवळील गावांमध्ये सीएसआर अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे सर्वांगीण ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. हे उपक्रम केवळ मदत न करता तर स्व: सक्षम करण्याबद्दल आहेत. योग्य गरजेनुरूप मदत, कौशल्ये आणि आत्मविश्वासासह व्यक्तींना त्यांची स्वतःची क्षमता शोधण्यात मदत करते. चिंचवली गावात राहणाऱ्या मनीषा गोटीराम रिकामे यांचं संपूर्ण कुटुंब पतीच्या शेतीवर अवलंबून होतं. पण दीपक फर्टिलायझर्सच्या दुग्धव्यवसायविकास प्रकल्पात सहभागी झाल्यावर परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. गायींची निगा, पोषण आणि प्रशिक्षणाच्या मदतीने त्यांनी आपल्या छोट्याशा गोठ्याला स्थिर उत्पन्नाचे साधन बनवले. त्यामुळे “मी पूर्णपणे माझ्या पतीच्या अनिश्चित उत्पन्नावर अवलंबून होते. जेव्हा दीपक फर्टिलायझर्स ने आम्हाला दुग्धव्यवसाय प्रशिक्षण दिले आणि दुधाळ गायी खरेदी करणायास मदत केली, तेव्हा सर्व काही बदलले. आता, मी रोज स्थानिक ग्राहकांना व खाजगी दूध डेअरीला दूध विकते आणि माझ्या दोन मुलींच्या आणि एका मुलाच्या शाळेचे शुल्क व इतर खर्च यातूनच भागवते. प्रथमच, मला आत्मविश्वास वाटतो, माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी माझा हातभार लागत आहे”असे मनीषा रिकामे यांनी स्पष्ट केले.
खैरवाडी गावातील अल्पभूधारक शेतकरी कालीबाई आणि श्रावण भगत यांनी जोपर्यंत त्यांनी दीपक फर्टिलायझर्स राबवत असलेल्या "वाडी" विकास उपक्रमात भाग घेतला नव्हता तो पर्यंत जवळजवळ शेती सोडून देण्याचा विचार केला व्होता.त्यांना शेतातून पुरेशे उत्पन्न मिळत नव्हते. तांत्रिक मार्गदर्शन आणि सुधारित पद्धतींमुळे, त्यांच्या शेतातून होणारे उत्पन्न वाढताना दिसत आहे.“आमची काही जमीन पडीक होती तर उर्वरित क्षेत्रातून पुरेशे उत्पन्न मिळत नव्हते. पण दीपकफर्टिलायझर्सच्या वाडी प्रकल्पाद्वारे, मी आंब्याची झाडे (केसर वाण) लावली आणि आंबा लागवडीच्या सुधारित पद्धती शिकल्या, तसेच आंबा लागवडीबरोबर मला भाजीपाला लागवड करणेही शिकवले. मी पडीक जमिनीवर आंबा लागवड केली व नवीन भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. पूर्वी मी फक्त १० ते १५ आर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करत होतो आणि आता मी ४० ते ५० आर क्षेत्रावर लागवड करत आहे. मी या वर्षी पहिल्यांदाच माझ्या बागेतील आंबे विकले. हे स्वप्नासारखे वाटले ज्या जमिनीवर मी आशा सोडली होती त्याच जमिनीतून मला आता उत्पन्न मिळत आहे,”असे कालीबाई यांनी सांगितले.
नितलसच्या वसुधा वसंत पवार यांच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य ही एक दूरची कल्पना होती. पण दीपक फर्टिलायझर्सच्या मदतीने, त्या एक लहान नाष्टा व चहा सेंटर उभारू शकल्या. त्यांनी या संदर्भात बोलताना “माझे स्वतःचे छोटे व्यवसाय असावे असे नेहमीच स्वप्न होते, पण आर्थिक परिस्तिथी मुळे ते शक्य होत नव्हते. जेव्हा दीपक फर्टिलायझर्सने मला योग्य प्रशिक्षणासह नाष्टा व चहा सेन्टर उभारण्यास मदत केली, तेव्हा मला एक व्यवसायिक महिला म्हणून एक नवीन ओळख मिळाली. आता मी दररोज कमवते आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते,” अशी अभिमानाने प्रतिक्रिया दिली.
सीएसआर उपक्रम राबवत असताना दीपक फर्टिलायझर्स लोकसहभाग आणि शाश्वत विकासावर भर देत आहे. कंपनीच्या उपक्रमांबद्दल बोलताना कॉर्पोरेट गव्हर्नन्स अध्यक्ष नरेश पिनिसेट्टी यांनी म्हंटले कि, “आमचा समुदायाशी संबंध फक्त आमच्या प्लांटच्या सीमांपुरता मर्यादित नाही. आम्ही या गावातील लोकांसोबत चालण्यावर विश्वास ठेवतो, त्यांना चांगले उपजीविका साधन, आरोग्य आणि चांगले प्रशिक्षण देण्यासाठी प्राधान्य देतो. आमच्या उपक्रमाचे खरे यश हे आहे की आम्ही आमच्या सभोवतालच्या समुदायाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो". दीपक फर्टिलायझर्स सीएसआर उपक्रम राबवत असताना दुग्धव्यवसाय पासून ते बागायती शेतीपर्यंत आणि लहान दुकानांपर्यंत, तळोजा परिसरातील समुदायासाठी एक आशेचा किरण ठरत आहे. कंपनी फक्त आर्थिक मदतीवर भर न देता सक्षमीकरण शाश्वत विकास यावर काम करत आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.