मुंबई ऊर्जा लिमिटेडच्या बळजबरी टॉवरविरोधात चिंध्रणवासियांचे आमरण उपोषण

 मुंबई ऊर्जा लिमिटेडच्या बळजबरी टॉवरविरोधात चिंध्रणवासियांचे आमरण उपोषण



पनवेल : राज भंडारी


चिंध्रण गाव तसेच गावठाण विस्तार व मुंबई ऊर्जा लिमिटेड मार्ग लिमिटेड यांच्या विरोधात बेकायदेशीर व अवैध टॉवर विरोधात चिंध्रण ग्रामस्थांनी सोमवार दिनांक २८ ऑगस्टपासून चिंध्रण ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करून शासनाचे डोळे उघडण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब केला आहे. सोमवारी सुरू झालेल्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी चिंध्रण ग्रामस्थांनी उपोषणामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

चिंध्रण ग्रामस्थांच्या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या लढ्याला वाचा फोडण्यासाठी अखेर ग्रामस्थांना लोकशाहीचे हत्यार उपसण्याची वेळ आली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून साधारणतः ७५ वर्षे उलटून गेली परंतू आजपर्यंत मौजे चिंध्रण येथे गावठाण विस्तार ही प्रकीयाच झाली नाही. मूळ गावठाणाबाहेर सातबारामध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या संखेत कित्येक पटीने वाढ झाली आहे. तसेच नव्याने अनेकवर्ष जिल्हाधिकारी अलिबाग यांच्याकडे सदर गावठाणविस्तारसंदर्भात पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे, मात्र शासनाकडून ग्रामस्थांची फक्त दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

चिंध्रण गावामध्ये २ वेळा ग्रामसभेचा ठराव करून ग्राम पंचायत आणि ग्रामस्थांचा पत्रव्यवहार करूनसुद्धा सदर प्रकिया लालफितीमध्ये अडकून पडली असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यावेळी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसून शासनाकडे गरजेपोटी गावठाणाबाहेरील सर्व घरे नियमित करून घेण्याची प्रमुख मागणी केली आहे, तसेच मुंबई उर्जा मार्ग लिमिटेड यांच्या उच्च विदयुत दाबाच्या टॉवर व वहीनी संदर्भातील न्यायाची मागणी केली आहे.

या आमरण उपोषणात चिंध्रण गावातील किरण कुंडलिक कडू, सुजित नामदेव पाटील, मनोज शिवराम कुंभारकर, राम गोविंद पाटील, विलास महादेव पाटील, मधुकर महादेव पाटील, शैलेश तानाजी अरीवले, जयराम धोंडू कडू, रुपेश शंकर मुंबईकर, बामा धाऊ भंडारी, गणेश अनंता देशेकर, संतोष चंद्रकांत अरीवले, सौ. ताईबाई रघुनाथ कडू, कु. समीर पांडुरंग पारधी आदींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.


चौकट


प्रमुख मुद्दे : 

०१. 

साधारणतः २०२२ पासून वर्षभर सरू असलेल्या उच्च विदयुत दाबाच्या टॉवरचे काम सुरू होऊन २०२३ चा ऑगस्ट महिना येऊन ठेपला आहे. आजपर्यंत कंपनीने ग्रामपंचायत किंवा बाधीत शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी घेतली नाही आणि बळजबरीने पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीने टॉवर मार्गीकेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी या  कंपनीसह प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

०२.

सर्व्हे नंबर २६ मधील सौ. पूनम नरेंद्र पाटील यांच्या क्षेत्रात जोरजबरदस्तीने १२ एप्रिल २०२३ ला सुरू असलेल्या टॉवरच्या कामाविरोधात ग्रामस्थांनी मोर्चा व आंदोलन करून संघर्षाने सदर काम बंद केले होते. 

०३.

टॉवर मार्गीका ही नियोजित सं. नं. ३१ मधून न घेता शेतकऱ्यांच्या ५० ते ६० सुपिक व लागवडयुक्त (दुबरपिक) जमिनीमधून वळविण्यात आल्या आहेत. परंतू पूर्वनियोजित मार्गाची नोटीस ही ग्रामपंचायतीला स. नं. ३१ ची आहे. 

०४.

तसेच शेकडो पत्र पाठवून दि. २४/०८/२०२३ रोजी तलाठी सजा पालेखुर्द यांनी दिलेला मार्गीकेचा नकाशा हा मूळ प्रत न देता छायांकित प्रती दिलेल्या आहेत व सदर नकाशा पूर्णपणे चूकीचा असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे.

०५. 

सदर मार्गीकेचा योग्य व मूळ नकाशा ( ओरीजनल) प्रिंट आम्हास मिळावी व नियोजित स. नं. ३१ (गुरूचरण) मधूनच टॉवर मार्गीका न्यावी ही मागणी चिंध्रण ग्रामस्थांची आहे.

०६.

नुकत्याच केलेल्या सर्वेनुसार स. नं. ३१ मधे कोणताही टॉवर दिसून येत नाही आणि स. नं. ४५ व स. नं. ३१ एकत्र केल्याचे येत असल्याने असा प्रकार का व कसा झाला याचे लेखे स्पष्टीकरण  मिळण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.