नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी भर पावसात केली नवी मुंबई क्षेत्र पाहणी
नवी मुंबई- आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत होते. या पार्श्वभूमीवर नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी भेटी देऊन विशेषत्वाने पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांची शहर अभियंता श्री. संजय देसाई व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच संबंधित अधिका-यांसह प्रत्यक्ष पाहणी केली.
23 जूनला मोठ्या प्रमाणात पावसास सुरूवात झाल्यानंतर आयुक्तांनी लगेचच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महानगरपालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्र आणि विभाग कार्यालये व अग्निशमन केंद्रे येथील आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज आहेत. झाडे वा झाडांच्या मोठ्या फांड्या वारापावसामुळे पडल्यास त्याठिकाणी जलद पोहचून रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घेणे, मोठा पाऊस आणि भरतीची वेळ जुळून आल्यास पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणचे पाणी उपसा पम्प्स कार्यान्वित करणे, भिंत पडणे अथवा इतर आपत्ती प्रसंगी तत्पर सेवा पुरविणे यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची मदत पथके व अग्निशमन दल अथक कार्यरत झाले.
या पार्श्वभूमीवर आज आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सीबीडी सेक्टर 6 मलउदंचन केंद्र व मार्केट परिसर, हर्डिलिआ कंपनीजवळील सायन पनवेल महामार्गाखालून जाणारा नाला व सानपाडा परिसर, सेक्टर 17 वाशी – तुर्भे नाला अरेंजा कॉर्नर परिसर, वाशीतील सेक्टर 4, 5, 6 व 9 चा परिसर, तुर्भे सेक्टर 21 परिसर अशा विविध ठिकाणी भेटी देत सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
सायन पनवेल महामार्गावरून वाशी सेक्टर 7 कडे उतरण्याच्या रस्त्यावर रविवारच्या जोरदार पावसात पाणी साचल्याने त्या ठिकाणी त्वरित चर खोदून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यात आली होती. त्या भागाची आयुक्तांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे वाशी सेक्टर सेक्टर 5 येथे एफ 1 टाईपच्या इमारतींसमोरील गटारावरील स्लॅब रविवारी कोसळला होता. त्या ठिकाणाला भेट देत आयुक्तांनी सदर काम पावसाची काहीशी उघडीप मिळाल्यानंतर तत्परतेने करण्याचे निर्देशित केले. तोपर्यंत तो पदपथ जाण्यायेण्यासाठी पूर्णपणे बंद करून काळजी घेण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.
या पाहणी दौ-यात सेक्टर 9 येथील व्यापारी वर्गाने मागील 4 दिवसात सतत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळूनही त्याठिकाणी पावसाळ्यापूर्वी बांधलेल्या कल्व्हर्टमुळे यावर्षी पाणी साचून राहिले नाही त्याबद्दल आभार व्यक्त केले. अशाच प्रकारे अनेक ठिकाणांवर अभियांत्रिकी विभागाने इलाज काढलेला आहे. नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने काही सखल भागात अतिवृष्टी आणि भरतीची वेळ जुळून आल्यास पाणी साचते. अशीच परिस्थिती सेक्टर 9 वाशी येथील होती. त्यावर अभियांत्रिकी विभागाने अभ्यास करून उपाययोजना केली आहे. अशाच प्रकारे इतरही पाणी साचण्याच्या संभाव्य 14 ठिकाणी उपाययोजना शोधाव्यात असे आयुक्तांनी सूचित केले.
आज 28 जून रोजी सकाळी 8.30 ते सायं. 6.30 या 10 तासात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 88.92 इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झालेली असून सर्वाधिक पाऊस दिघा विभागात 148 मि.मि. इतका कोसळला. त्या खालोखाल कोपरखैरणे विभागात 130.60 मि.मि. इतकी पावसाची नोंद झाली असून ऐरोली, घणसोली विभागत 97.20 मि.मि. इतकी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामानाने शहराच्या दक्षिण भागात बैलापूरमध्ये 58.20 मि.मि., नेरूळ विभागात 32.50 मि.मि. आणि वाशी विभागात 67 मि.मि. इतकी पावसाची नोंद झालेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून सर्व यंत्रणा सतर्क आहेत. आयुक्तांनी या कालावधीत कोणीही आपले मोबाईल बंद ठेवू नयेत असे निर्देश महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदास दिलेले असून नागरिकांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी नजिकच्या विभाग कार्यालयास अथवा महापालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्रास 022-27567060/61 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 1800222309-1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.