आदिवासी बांधव आजही 'महाराष्ट्र माझा' म्हणतात हे शासनाच्या कामाचे यश-डॉ. नीलम गोऱ्हे
अलिबाग, दि.25 (जिमाका) :- महाराष्ट्रातील आदिवासी समाज जागृत आहे. शासकीय अधिकारी काम करीत आहेत. अनेक सामाजिक संघटना आपल्यासाठी काम करत आहेत. साकव सारख्या संस्था चांगले काम करीत आहेत. आदिवासी महाराष्ट्र माझा म्हणतात हे शासनाच्या कामाचे यश आहे. आदिवासींच्या कामाचा लढा अनेक वर्षे सुरू आहे यामुळे त्यांना न्याय मिळण्यास मदत होते आहे. विधवा महिलेची जमीन विकता येत नाही अशा प्रकारचे अनेक निर्णय या आधी झालेले आहेत. आज तुम्हाला मिळत असलेली जमीन ही तुमचीच आहे. ती आपल्या ताब्यात देताना विशेष आनंद होत आहे.
रायगड जिल्हाधिकारी यांच्या वतीने आज पती पत्नी दोघांच्या नावे जमीन होणार असे निर्णय झाले आहेत. हे मुख्यमंत्री ना. श्री. उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कामाचे यश आहे. आता आदिवासी बांधवांच्या जमीन मोजणी करून आता पुढील प्रक्रिया पार पडेल,असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.
साकव या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना दळी जमिनीच्या पट्ट्यांच्या वाटपाचा कार्यक्रम आज बर्डावाडी येथे घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
साकव संस्थेचे अरुण शिवकर यांनी, एकत्र दळी जमिनींचे पट्टे आल्याने परस्परांमध्ये वाद निर्माण होतात. वैयक्तिक नाव सातबारावर यावे. रोहयो कामामध्ये जमिनी विकसित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. दोन गावांचे आराखडे सादर केले आहेत. त्याला मंजुरी मिळावी. जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन व्हावी. रोहयो बाबत दर निश्चिती व्हावी, अशा मागण्या मांडल्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पाणंद रस्ते आणि इतर कामे रोहयो अंतर्गत घेता येतील. मजुरी वाढविण्याबाबत शासन स्तरावर विचार सुरू आहे. मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आपल्या विकासासाठी कटिबद्ध आहे.' मजुरीवर जाणाऱ्या महिलांनी शारीरिक आरोग्याचा विचार केला पाहिजे. शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रकल्प तयार करण्याच्या सूचना आज जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे, शीतल म्हात्रे, दीपाली पोटफोडे, किशोर जैन, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र माझा आणि जमिनीच्या प्रश्नावर बाजू मांडणाऱ्या गीतांचे सादरीकरण केले.
पुढील बैठक ऑगस्ट 2022 मध्ये घेणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.आदिवासी बांधवांच्या मुलांना शिष्यवृत्ती आणि फी भरण्यासाठी यावर्षीपासून संपर्क करण्याचे श्री.किशोर जैन यांच्या संस्थेने आवाहन केले आहे.
जमिनीच्या मालकीच्या उताऱ्याची आणि पती पत्नी दोघांच्या फोटो फ्रेम मध्ये घरात लावून ठेवा, अशीही सूचना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.