सैनिकांच्या शासन दरबारी प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी अमृत जवान अभियान राबविण्यात येणार-पालकमंत्री . दादाजी भुसे

सैनिकांच्या शासन दरबारी प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी अमृत जवान अभियान राबविण्यात येणार-पालकमंत्री . दादाजी भुसे


पालघर दि 14 : राज्यातील विविध शासकीय कार्यालयात शहीद जवान, माजी सैनिक, शहीदांच्या विधवा, कर्तव्यावर कार्यरत असणारे सैनिक याचे कुटुंबिय यांची अनेक शासकीय कामे असतात. शासन दरबारी असे प्रलंबित असणा-या कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी देशाच्या ७५ व्या स्वातंत्रदिनाच्या महोत्सवानिमित्त "अमृत जवान अभियान २०२२  दि १ मे २०२२ १५ जून २०२२ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार  असल्याची माहिती कृषी,माजी सैनिक कल्याण मंत्री  तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

        महसुल, भूसंपादन पुनर्वसन,अशा प्रकारचे विविध  दाखले, पोलिस विभागाकडील तक्रारी, ग्रामविकास विभागाच्या विविध योजना, कृषि विभागाकडील विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे ,परिवहन विभागाचे परवाने अशा इतर कामांसाठी विशेष मेळाये घेवून शहीद जवान, गाजी सैनिक व सेवेत कार्यरत सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी अभियान राबविण्यात यावे असे निर्देश  श्री. भुसे यांनी सर्व विभागाला दिले होते. त्यानुसार सदरचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

        विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पोलिस अधिक्षक,आयुक्त महानगरपालिका, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उपवनसंरक्षक,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,. अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग अधिक्षक अभियंता महावितरण, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी सैनिक जिल्हा संघटनेचा एक प्रतिनिधी, संरक्षण विभागातील एक प्रतिनिधी असे सदस्यांची समिती असेल.  या समिती मध्ये निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव असतील. असे श्री. भुसे यांनी सांगितले.

     त्याचप्रमाणे तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी याचे अध्यक्षतेखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती,सहा. निबंधक सहकारी संस्था तालुका कृषि अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत, उपअधिक्षक भूमी अभिलेख, तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे एक प्रतिनिधी, विशेष निमंत्रित  हे या समितीचे सदस्य असतील तर तहसिलदार समितीचे सदस्य सचिव असतील असे श्री. भुसे यांनी सांगितले.

      दर महिन्याच्या तिस-या सोमवारी लोकशाही दिनाच्या धर्तीवर "अमृत जवान सन्मान दिन" आयोजित करण्यात यावा, हे अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक तहसिल कार्यालयात एक खिड़की कक्ष या तत्वाप्रमाणे सहायता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी स्वतंत्र कर्मचा-याची नेमणूक होणार असून दुपारी १२ ते ३ या कालावधीत विभागांकडील विविध तक्रार अर्ज स्विकारण्यात येतील व सबंधिताना प्राप्त झालेल्या अर्जाची पोहोच तात्काळ देवून अर्ज संबंधित विभागाकडे वर्ग होणार आहे. प्रलंबित तक्रारी निवारण्यासाठी • प्रत्येक विभागाला ठराविक कालमर्यादा असेल व त्याचे सनियंत्रण जिल्हाधिकारी करतील असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.