दहशतवादाचा तीव्र निषेध – पनवेलमध्ये विराट मशाल मोर्चा

 दहशतवादाचा तीव्र निषेध – पनवेलमध्ये विराट मशाल मोर्चा 




पनवेल (प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड व अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल शहराच्या वतीने एक विराट मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रभक्तीचा धगधगता ज्वालामुखी बनलेला हा मोर्चा संपूर्ण परिसरात दहशतवादाविरोधात जागृतीचा संदेश ठरला. 
         काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने पनवेल परिसरातील खांदा कॉलनी ते नवीन पनवेल दरम्यान विराट मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मशाल मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह, युवक, युवती, शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी "भारत माता की जय" घोषणांनी परिसर देशभक्तीने निनादला होता. तर पाकिस्तानचा झेंडा जाळत "दहशतवाद मुर्दाबाद", "पाकिस्तान मुर्दाबाद" अशा घोषणा देत घोषणांमधून केवळ संताप नव्हे, तर दृढ निर्धाराचे प्रतिबिंब उमटले. हा मोर्चा निषेधाच्या पलीकडे जाऊन, केंद्र सरकारच्या दहशतवादविरोधी कठोर आणि निर्णायक धोरणांना जाहीर पाठिंबा दर्शवणारा ठरला. देशाच्या एकात्मतेला हादरा देणाऱ्या प्रयत्नांचा खात्मा करण्यासाठी सरकारच्या पाठीशी अखंडपणे उभे राहण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या निष्पाप पर्यटक आणि शहीद जवानांप्रती श्रद्धांजली अर्पण करताना, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी असल्याचे भावनिक शब्दांत व्यक्त करण्यात आले. 
        या मोर्चात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितिन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, नवीन पनवेल शहर मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, सुशीला घरत,  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, जगदीश घरत, ज्योती देशमाने, भीमराव पोवार, किशोर चौतमोल, शिवाजी भगत, गोपिनाथ मुंडे, सय्यद अकबर, रुपेश नागवेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, उपाध्यक्षा शिवानी घरत, रोहित जगताप, युवामोर्चा खारघर शहर अध्यक्ष  नितेश  पाटील, गौरव कांडपिले, प्रीतम म्हात्रे, राकेश भुजबळ, कोमल कोळी, देवांशु प्रभाळे, अक्षय सिंग, रोहित कोळी, शुभम कांबळे, श्रवण  घोसाळकर, मोतीलाल कोळी, यश भोईर, राजू महापूरकर, वरुण डंगर, कुलबीर सिंग, आशा मुंडे, रामनाथ,पाटील, युवराज बेडसे, विश्वास काथारा, उदय काथारा, यांच्यासह पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
       यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले विचार मांडताना म्हंटले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३७० कलम रद्द करून कश्मीरच्या विकासाला चालना दिली गेली. जगभरातले पर्यटक काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येऊ लागले. आणि अशातच पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. निष्पाप पर्यटकांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला. त्यामध्ये आपल्या पनवेलचे दिलीप देसले यांनाही गोळ्या झाडून मारण्यात आले. धर्म विचारून हिंदू धर्माच्या लोकांची हत्या करणाऱ्या या घटनेचा मी निषेध करतो. ते पुढे म्हणाले कि, आपल्याला या पाकिस्तानच्या बद्दल चीड असणारे जे जे प्रसंग आहेत ते मनात साठवून ठेवले पाहिजेत आणि त्या प्रसंगाची आठवण प्रत्येक क्षणाला आपल्याला झालीच पाहिजे. देश बांधवांची अशा पद्धतीने हत्या करणाऱ्या विश्वासाने गळा घोटणाऱ्या शक्तींना मी कुठे भर देत नाहीये ना याचा विचार आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला करावा लागणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. 
           पहलगाम येथे झालेला हल्ला हा फक्त मानवतेवर झालेला हल्ला नसून तो हिंदू धर्मावर झालेला हल्ला आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मशाल मोर्च्याचा आयोजन करण्यात आले होते. ही मशाल सतत आपण पेटती ठेवली पाहिजे असे मत यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी व्यक्त केले.  दरम्यान माजी नगरसेवक एडवोकेट प्रकाश बिनेदार यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना म्हणाले नवीन पनवेल येथील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निवासस्थानी  काल लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली आम्ही त्यांच्यासोबत होतो . माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देसले कुटुंबीयांना कोणतीही मदत लागल्यास माझ्या घराचे दरवाजे दिसले कुटुंबीयांसाठी कायम उघडे असतील असे आश्वासित केल्याचे नमूद केले.