रायगड जिल्हा प्रशासनाची तत्परता..आपत्ती व्यवस्थापनाच्या जय्यत तयारीची फलश्रुती-भर समुद्रात अडकलेल्या खलाशांची हेलिकॉप्टरच्या सहाय्याने केली सुटका

 

रायगड जिल्हा प्रशासनाची तत्परता..आपत्ती व्यवस्थापनाच्या जय्यत तयारीची फलश्रुती-भर समुद्रात अडकलेल्या खलाशांची हेलिकॉप्टरच्या सहाय्याने केली सुटका



अलिबाग, दि.10 (जिमाका):-* गुजरातहून मासेमारी करण्यासाठी आलेले हरेश्वरी बोट क्रमांक IND-GJ-32-2095 हे जहाज मुरुड तालुक्यातील पद्मदूर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस काल (दि.09 ऑगस्ट) रात्रीपासून मोरे गावाजवळील भर समुद्रात अडकून पडले होते. या जहाजावरील 10 खलाशांना वाचविण्यास जिल्हा प्रशासन व भारतीय तटरक्षक दलास यश मिळाले.

     या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने कामाला लागली. भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आल्यानंतर रात्रभर समुद्रात अडकून पडलेल्या या 10 खलाशांच्या सुटकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. आज (दि.10 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता तटरक्षक दलाचे जवान CG 853 या हेलिकॉप्टरमधून जहाजावर उतरले आणि त्यांनी दहाही खलाशांना सुखरूप बाहेर काढले.

     *या खलाशांची नावे पुढीलप्रमाणे:-*

     राजेश किशन हरबदी (वय 24, ता.पारधी, जि.बलसाड, गुजरात), आशिष रमेश वारली (वय 24, ता.उमरगा जि.बलसाड, गुजरात), लिवेश कांकडिया, (वय 22, ता.उमरगा जि.बलसाड), अश्विन बैला (वय 24, ता.उमरगा, जि.बलसाड), मनिष राकेशभाई हडपती, (वय 26, ता.पारधी जि.बलसाड), बिर बाबूलाल बायमाची (वय 13, जि.बलसाड), अजय चंदूभाई नायब, (वय 25, ता.उदवाडा जि.बलसाड), बंटी चन्नयाभाई माची (वय 28, ता.उमरगा जि.बलसाड), निखिल निलेशभाई माची (वय 19, ता.उमरगा जि.बलसाड), शुभम सुभाषभाई माची (वय 10, या.उमरगा जि.बलसाड)

     जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि मुरूड तहसिलदार रोहन शिंदे यांनी सीमा तटरक्षक दल आणि पोलीस दलाशी समन्वय साधून या खलाशांचे प्राण वाचविण्यास यश मिळविले. यातून जिल्हा प्रशासनाची कार्यतत्परतेची आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जय्यत तयारीची फलश्रुती दिसून येते.