“घरोघरी तिरंगा” उपक्रमाअंतर्गत उमेदमार्फत कोंकण भवनात राष्ट्रध्वजाची विक्री
नवी मुंबई दि. 11 :- स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत (उमेद) संपूर्ण महाराष्ट्र्रात एकूण 21 लाख 97 हजार 997 झेंड्यांची विक्री करण्यात येत आहे. यापैकी 3 लाख 76 हजार झेंडे महिला बचत गटांनी स्वत: तयार केले असून 18 लाख 19 हजार 997 झेंडे शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या विक्रीदारांकडून घेण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे यांनी दिली.
“घरोघरी तिरंगा” अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत (उमेद) कोंकण भवन प्रशासकीय इमारतीच्या तळ मजल्यावरील आवारात उभारण्यात आलेल्या प्रदर्शन व विक्री दालनाचे उद्घाटन विभागीय उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अवर सचिव श्री. धनवंत माळी, उपसंचालक (कृतीसंगम) श्रीमती शितल कदम, उप मुख्यकारी अधिकारी मनिषा देवगुणे आदी अधिकारी, कर्मचारी तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे विविध उपक्रम राबवून साजरा होतो आहे. या महोत्सवाचा भाग म्हणून कोकण विभागात “घरोघरी तिरंगा” हा अत्यंत महत्त्वकांशी उपक्रम दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान राबविण्यत येत असून या उपक्रमातंर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत (उमेद) महिला बचत गटांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण देऊन विविध ठिकाणी स्टॉलद्वारे राष्ट्रध्वजाची विक्री करण्यात येत आहे. या महिला बचत गटांमार्फत राष्ट्रध्वज संहितेनुसार देण्यात आलेल्या आकाराचे ध्वज विक्री करण्यात येत आहेत. यातून महिला बचत गटांना आर्थिक मदत होऊन बचत गट आर्थिक दृष्टया सक्षम होण्यास मदत होत आहे. कोंकण भवन इमारत तसेच सिडको भवन इमारतीच्या आवारात सलग दोन दिवस हे स्टॉल लावण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत (उमेद) मंत्रालय मुंबई येथे लावण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या विक्री दालानातून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ध्वज खरेदी करुन “घरोघरी तिरंगा” या अभियानात प्रत्येक नागरिकांने सहभाग घेऊन राष्ट्रध्वज विकत घ्यावा आणि स्वयंस्फूर्तीने “घरोघरी तिरंगा” हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन देखील केले आहे.
“घरोघरी तिरंगा” या उपक्रमाची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी व्हावी या करिता जिल्हा,तालुका, गावपातळीवर रांगोळी स्पर्धा, मॅरोथॉन स्पर्धा, बाईक रॅली, प्रदर्शने, स्टॉल विक्री अशा विविध माध्यामातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत (उमेद) जनजागृती करण्यात येत आहे.