गावांचा विकास साध्य करण्यासाठी सरपंच, पदाधिकारी यांची मानसिकता गावाच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक - पालकमंत्री कु. आदिती तटकरे
अलिबाग,जि.रायगड,दि.13 (जिमाका):- म्हसळा तालुक्यातील गावांचा विकास साध्य करून घेण्यासाठी त्या त्या गावातील सरपंच, पदाधिकारी यांची मानसिकता गावाच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी खारगाव बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करताना केले.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी खारगाव बुद्रुक येथील सामाजिक मंडळासाठी 5 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उपलब्ध निधीतून उभारण्यात आलेल्या सभागृहाचे बांधकाम ग्रामस्थांनी चांगल्या दर्जाचे केल्याबद्दल पालकमंत्री कु.तटकरे यांनी सर्वांचे कौतुक करून समाधान होत असल्याची भावना व्यक्त केली. खारगाव बुद्रुक गावातील पाणीपुरवठा करणे, या कामासाठी 36 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून भविष्यात गावात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असे सांगितले.
यावेळी अलिशेठ कौचाली, समीर बनकर, तहसिलदार समीर घारे, गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, माजी सभापती उज्वला सावंत, सरपंच अनंत नाक्ती, अंकुश खडस, मनोज नाक्ती, दामोदर पांडव, रेश्मा काणसे, नाना सावंत, अनिल बसवत, सतीश शिगवण, प्रकाश गाणेकर, लहू म्हात्रे, चंद्रकांत कापरे आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हसळा तालुक्यातील गाव, वाडी, वस्तीतील लोकोपयोगी विकासकामांसाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकासनिधीतून सुमारे 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून होणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
म्हसळा तालुका नियोजित दौऱ्यात म्हसळा तालुक्यातील खारगाव बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन, म्हसळा शहरातील कन्याशाळेजवळील श्री राम अंगणवाडी इमारत बांधकाम भूमीपूजन, बनोटी-कातळआळी येथील सभा मंडपाचे भूमीपूजन, खरसई नवीन वसाहतीमधील वीज पोलचे उद्घाटन, खरसई येथे नवीन साकव बांधकामाचे उद्घाटन, खरसई जय हनुमान मित्र मंडळाच्या सभामंडप कामाचे भूमीपूजन, काळसुरी-महिला सामाजिक सभागृहाचे उद्घाटन, असे विविध कार्यक्रम पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.